सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पाच दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून त्यामुळे संतप्त झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ आणि वीज ग्राहक संघटनेने महावितरणच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने नुकसानभरपाई देण्याची आणि एक महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे.
अपुरा कर्मचारी आणि साधनसामग्री: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दीड लाख ग्राहकांना पाच दिवस काळोखात काढावे लागले. महावितरणकडे आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.अधिकारी आणि मनुष्यबळाची कमतरता आहे.सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांनी वीज वितरण कंपनीतील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची कमतरता हे या संकटाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.
हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष: गेल्या सहा महिन्यांपासून संभाव्य आपत्तीबाबत निवेदन देऊनही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे नितीन वाळके व ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी करायची कामे आणि खबरदारी घेतली न गेल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली. निलंबित अधिकाऱ्यांवर नाराजी: आपत्कालीन व्यवस्थेत हलगर्जीपणा केल्याबद्दल दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असले तरी, त्यात त्रुटी असून त्यांना दुसरी वाट मोकळी करून दिली असल्याचा आरोपही करण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याला हरताळ: जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मांडलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याला वीज यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासला असल्याचा आरोप ॲड. वेंगुर्लेकर यांनी केला. व्यावसायिकांचे मोठे नुकसान: जिल्हा व्यापारी संघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी सांगितले की, २० मे पासून जिल्ह्यातील जवळपास दीड लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत. यामुळे व्यापारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याने पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे.
नुकसानभरपाईची मागणी: वीज नियामक मंडळाच्या कायद्यानुसार ग्राहकांना झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याची तरतूद असल्याने, काळोखात राहिलेल्या ग्राहकांना नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी नितीन वाळके यांनी केली. दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्याची मागणी त्यांनी केली. दोडामार्ग तालुक्यातील समस्या: दोडामार्ग तालुका वीज संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी यांनी सांगितले की, दोडामार्ग तालुक्यात उपभियंता पद आठ महिन्यांपासून रिक्त आहे आणि सहायक अभियंता बेपत्ता आहेत. महालक्ष्मी कंपनी तीन वर्ष करार संपुष्टात आल्याने दोडामार्ग ला वीज पुरवठा करत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
नवीन आपत्ती व्यवस्थापन डायरी आणि स्वतंत्र कक्ष: ॲड. वेंगुर्लेकर यांनी नवीन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन डायरी तयार करण्याची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा उपविभागांमध्ये स्वतंत्र वीज ग्राहक कक्ष निर्माण करण्याची मागणी केली. तसेच आडाळी एमआयडीसीमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा निर्माण केली जावी अशी मागणी केली. यावेळी दीपक पटेकर, बाळ बोर्डेकर,श्रीकृष्ण तेली, संजय तावडे, जयराम वेंगुर्लेकर व मान्यवर उपस्थित होते.