सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसाच्या जोरावर उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ७८.५५ टीएमसीपर्यंत वधारला असून, यात उपयुक्त पाणीसाठा १४.८९ टीएमसी आहे. धरण २७.८० टक्के भरले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्येही अवघ्या १५ दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
सोलापूर शहराला खेटून असलेल्या एकरूख प्रकल्प अर्थात हिप्परगा जलाशयात १.८८ टीएमसी झाला असून, त्याची टक्केवारी ८७.०३ एवढी मोठी आहे. त्यामुळे या जलाशयात पाणीसाठा आणखी वाढल्यास पाणी दोन्ही मुक्त सांडव्यातून सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. हे सोडलेले पाणी सोलापूर शहरातील पुणे नाका, बार्शी रस्त्यासह अवंती नगरी, वसंत विहार व अन्य नागरी वसाहतींमध्ये घुसण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली असून, त्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील हिंगणी पा. मध्यम प्रकल्पात १.२८ टीएमसी तर जवळगाव प्रकल्पात ०.७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच करमाळा तालुक्यातील मांगी प्रकल्पात ०.४१ टीएमसी तर मोहोळ तालुक्यातील आष्टी प्रकल्पात ०.४७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरी अर्थात कुरकूर धरणातही ०.४१ टीएमसी म्हणजे २५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव प्रकल्पात ०.३९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. अशाप्रकारे एकूण सात मध्यम प्रकल्पांमध्ये ५.५६ टीएमसी म्हणजे ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात या सर्व सात मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यात सुमारे अडीच टीएमसी इतकी वाढ झाल्याचे दिसून येते.