उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर २०१९ साली घेतलेल्या शपथविधीवरून पुन्हा एका राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच हा शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे.

‘मुंबई तक’ला बोलताना सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं की, “शरद पवारांनी अनुमती दिली, असं देवेंद्र फडणवीस सांगतात, तेव्हा माझ्यासारख्यांना विश्वास बसतो. देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य केलं, तेव्हा पहिल्या २३ नोव्हेंबर २०१९ चा दिवस आठवला. कारण, शपथविधीच्या दिवशी मी चंद्रपुरला होतो. शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना फोन केला, ते म्हणाले शरद पवार आपल्याबरोबर आहेत. दोन दिवसांनी सर्व व्यवस्थित होईल. पण, नंतर घडलेल्या घटनेनंतर मलाही आश्चर्य वाटलं.”

हेही वाचा : “लग्न लावायचं गंगूशी अन् संसार…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावरून आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

“मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय अजित पवार एवढं मोठं पाऊल कसं उचलू शकतात. अजित पवार हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की, आपल्याला स्थिर सरकारच्या दिशेने जायचं आहे. केंद्रात भाजपाचं सरकार आहे, अशा प्रसंगात राज्यातील जनतेला न्याय द्यायचं आहे. मग, भिजतं घोंगडं ठेऊन राज्यात स्थिर सरकार देऊ शकणार नाही,” असेही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा : “कामाख्या देवी महाराष्ट्रात आहे…”, आसाम सरकारच्या जाहिरातीनंतर जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काही गट असतील असं वाटत नाही. कारण, अजित पवारांच्या भाषणात शरद पवारांचा उल्लेख सन्मानाने केला जातो. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांच्यात मतभेद असल्याचं वाटत नाही,” असेही मुनगंटीवर यांनी म्हटलं.