मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली आहे. ‘ओबीसी’मधील ६० टक्के लोक भाजपाला मतदान करतात. त्यामुळे जर ‘ओबीसीं’च्या ताटातून काढून ते त्यांना (मराठा समुदाय) देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भुजबळांनी सरकारला दिला. दरम्यान, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली. यावर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्यासाठी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छगन भुजबळांना पुढे केलं जात आहे. त्यामुळे माझी राज्यपालांना विनंती आहे की, त्यांनी भुजबळांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “लाठीमार होताच मनोज जरांगे घरात जाऊन झोपले”; भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…

जरांगे आणि भुजबळ यांच्यातील संघर्षावर भाष्य करताना विनायक राऊत म्हणाले, “मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी शांततापूर्वक लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून आम्हाला आरक्षण द्या, अशी कोणतीही मागणी अद्याप त्यांनी केली नाही. उलट ओबीसी, एसटी, एससी अशा विद्यमान आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावं, अशीच त्यांची मागणी आहे. पण भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्यासाठी छगन भुजबळांसारख्या कॅबिनेट मंत्र्याला पुढं केलं आहे.”

हेही वाचा- भुजबळांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्याची धमकी? भास्कर जाधवांचं मोठं विधान; म्हणाले, “तुम्ही जामिनावर तुरुंगाबाहेर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“छगन भुजबळ यांनी जाहीरसभेत जी वक्तव्ये केली आहेत, त्यांनी जी भाषा वापरली आहे, ती एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांला शोभणारी भाषा नाही. ज्या मंत्र्यांने दोन्ही समाजात सामंजस्य निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्याच मंत्र्याने जरांगेंचा आरे-तुरे उल्लेख करायचा, त्यांना मारण्याची धमकी द्यायची आणि दादागिरीची भाषा करायची, हे योग्य नाही. त्यामुळे मी राज्यपालांना विनंती करतो की, त्यांनी छगन भुजबळांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी,” अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली.