Vijay Wadettiwar on Mahavikas Aghadi Defeat in Maharashtra Assembly Election 2024 : “महाविकास आघाडीत तब्बल २० दिवस जागांचा घोळ कायम ठेवण्यात आला, जागावाटपाच्या घोळाचाच मविआला विधानसभा निवडणुकीत फटका बसला”, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवावर वडेट्टीवार यांनी त्यांचं मत मांडलं. तसेच मविआच्या निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे बोट दाखवलं. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून राज्यात महायुतीने प्रचंड बहुमतासह सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर आता मविआ नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं सुरू केलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवाची अनेक कारणं आहेत. जागावाटपाला लागलेला वेळ हे देखील त्यापैकी एक कारण आहे. जागांचा घोळ सोडवण्यासाठी मविआ नेत्यांना २० दिवस लागले. २० दिवस जागांचा घोळ कायम ठेवण्यात आला. नाना पटोले संजय राऊत हे प्रमुख नेते तिथे होते. आम्ही देखील होतो. जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सोडवला असता तर आम्हाला प्रचारासाठी १८ दिवस मिळाले असते. त्यामुळे आम्ही योग्य योजना आखू शकलो असतो. परंतु, आम्ही २० दिवस जागांचा घोळ कायम ठेवला. त्यामुळे आम्ही योजना आखू शकलो नाही. आम्हाला योग्य प्रकारे प्रचार करता आला नाही. निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांना संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे आमच्या पराभवाचं प्रमुख कारण असेल असं मला वाटतं”.

हे ही वाचा >> “जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

विजय वडेट्टीवार म्हणाले, “आम्ही जागावाटपात वेळ वाया घालवला. बऱ्याचदा जागावाटप करण्यासाठी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली जायची. मात्र, अनेक नेते या बैठकीला दुपारी २ वाजता यायचे. अनेक नेत्यांना उशीर व्हायचा. मी कोणाचंही नाव घेणार नाही. परंतु, या बैठका लांबत गेल्या एकेका जागेवरून वारंवार चर्चा झाल्या. त्याच त्याच गोष्टींवर पुन्हा पुन्हा चर्चा होत गेली. जागांचा घोळ दोन दिवसांत सुटला असता तर आम्हाला प्रचारासाठी २० दिवस मिळाले असते आणि आम्हाला निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा झाला असता. परंतु, जागावाटपात वेळ वाया गेल्यामुळे आमचं नुकसान झालं. यात कोणाचं षडयंत्र होतं का अशी शंका घ्यायला जागा आहे”.