Maratha Reservation Protest Updates : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्यासह अनेक मराठा बांधवही मुंबईत येऊन शांततेत आंदोलन पुकारणार आहेत. हे आंदोलन राज्यव्यापी असणार असल्याने राज्यातील विविध कोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईत धडकू शकतात. त्यामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे सर्व थांबवण्याकरता सरकार पातळीवर ट्रॅप रचणं सुरू असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. हा नेमका ट्रॅप काय आहे, याबाबत आज त्यांनी माध्यमांना माहिती दिली. तसंच, काहीही झालं तरी २० जानेवारीला मुंबईत येणारच असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

मनोज जरांगे म्हणाले, सरकार माध्यमांना बातम्या देतात की मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा निघालेला आहे. परंतु, प्रत्यक्षात कोणताही तोडगा निघालेला नाही. गिरीश महाजनही म्हणाले होते की मराठा आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, त्याआधीच मराठा आरक्षण मिळेल. पण कुठे आहे आरक्षण? सगेसोयरे शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली असतानाही त्यात सातत्याने गोंधळ निर्माण केला जात आहे. त्यामुळे मी मरेपर्यंत इथून हटणार नाही. तुम्ही मराठ्यांना पक्क आरक्षण दिल्याशिवाय जागाच सोडणार नाही. मी मुंबईत येणार म्हणजे येणारच. मग तुम्ही कितीही ट्रॅप रचा. तुम्हाला मराठे फिरूच देणार नाहीत. आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरंच.”

प्रमाणपत्रांचं वाटप नाही

“आमचं म्हणणं आहे की ज्याची नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र द्या. त्या आधारावर त्यांच्या सगे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या. शिष्टमंडाळाने सांगितलं होतं की येत्या सहा दिवसांत रांत्रदिवस काम करून नोंदी सापडलेल्या ५४ लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देतो. पण अद्यापही प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं नाही, असं जरांगे म्हणाले.

गोडी गुलाबीने तोडगा काढावा लागेल

तसंच, “मसुदा तयार केला जातो. तो वाचायला आणि दुरुस्ती करायला माझ्याकडे येतो. हा काय पोरखेळ लावला आहे. तुमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे वाटत असेल की तुमच्या एवढे हात वर पोहोचले आहेत. पण जनतेएवढे हात कोणालाच नाहीत. आयुष्यातून तुम्हाला उठवू. राजकीय करिअरमध्ये ५० वर्षे तुम्हाला सुधारणार नाही. आंतरवालीचा प्रयोग तुम्ही परत करू नका. मला माहितेय तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली आहे. ७० वर्ष मराठ्यांनी झुंज दिली. आई-बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आहे. साडेतीनशे मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे. तुम्हाला गोडी गुलाबीने प्रश्न सोडवावा लागेल. तुम्हाला व्यवस्थित तोडगा काढावा लागेल”, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठ्यांना वेड्यात काढू नका

“सगळ्या मराठ्यांनी घराच्या बाहेर पडा. उद्रेक जाळपोळ करू नका. कोणी व्यसनही करायचं नाही. शांततेत चालायचं. जे मुंबईला येणार नाहीत, त्या मराठा बांधवांनी गावाबाहेर रस्त्यांवर जेवणाची, पाण्याची स्टॉल्स लावा. आरोग्य शिबीर भरवा. शौचालयांची सुविधा करून ठेवा. मराठ्यांनी ताकदीने उसळून रस्त्यावर या. सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही. सरकार शिष्टमंडळाला पाठवून शेवटच्यावेळी पळण्याचा प्रयत्न करतंय. एकूण सात महिने सरकारला वेळ दिला. मराठ्यांना वेड्यात काढता?” असा सवालही जरांगेंनी विचारला.

हेही वाचा >> मराठा आरक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल; मागासवर्ग आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

मराठ्यांना वेडे समजलात का?

“कोण-कोण आरक्षणाला विरोध करतोय हे माहितेय, नाव घेतलं की सुपडा साफ केला म्हणून समजा. मराठा आंदोलनासाठी सात राज्य एकत्र येणार आहेत. हे आंदोलन देशव्यापी करणार आहोत. त्यामुळे सरकारने सकारात्मक तोडगा काढावा. नोंदी सापडलेल्या ५४ लाखांना प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत. त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ घेतला. त्यांनंतर मुंबईत येण्यासाठी एक महिन्याचा वेळ मिळाल. पुनर्विचार याचिका निकाल आणला नाही, मराठ्यांना वेडे समजलात का?” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनासाठी कोणी ट्रॅप रचलाय हेही माहितेय

“मुंबईत आल्यावर गोळ्या घातल्या तर मी गोळ्या झेलायला तयार आहे. मराठ्यांना विनंती आहे की यांनी गोळ्या घालून मला मारलं तरी माझा विचार मरू देऊ नका. आंदोलन थांबवू नका. कोणीही मागे हटायचं नाही. राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे. २० तारखेला मुंबईला निघालो म्हणजे निघालो. या आंदोलनासाठी कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, हे सगळं माहितेय. रात्रीच्या बैठकीत कोणी विरोध केला, कोणी केला नाही, कोण अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोललं हेही माहितेय. २० जानेवारीच्या रॅलीत कोणता आमदार सामील होतोय हे पाहुयात”, असं आव्हानही त्यांनी केलं आहे.

हेही वाचा >> “सरकारकडून माझ्यावर डाव…”, मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली साशंकता, म्हणाले “हे षडयंत्र..”

कसा आहे ट्रॅप?

“ट्रॅप असा आहे की जे मराठा आंदोलनात काही असंतुष्ट आत्मे आमच्यात आहेत. या आंदोलनातील काहींच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या आहेत. त्यांना काही नेत्यांनी हाताखाली घेतलं आहे. यामध्ये काही पालकमंत्री आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजी नगर, लातूर, नागपूर येथील काही नेते आहेत. हे नेते आमच्या रॅलीत येणार. रॅलीत उभे राहणार. फोटो काढणार आणि निघून जाणार. आणि माध्यमांत येऊन सांगणार की जरांगे पाटील भेटले नाहीत. असं करून ते मराठ्यांत फूट पाडणार. परंतु, कोणाचं ऐकून तुम्ही स्वतःच्या पायावर दगड पाडून घेऊ नका”, असं आवाहनही केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.