‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित बहुचर्चित ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे सध्या या दोघांची चर्चा सुरु असून या दोघांनी नुकत्याच एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचं महत्व समजावून सांगितलं आहे.

‘सुईधागा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या चित्रपटाच्या टीमने आज उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला. इतकंच नाही तर अनुष्का आणि वरुणने इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांनीही राष्ट्रध्वज पकडला असून ते तिरंगामधील तीनही रंगांच महत्व सांगताना दिसत आहेत.

राष्ट्रध्वजामध्ये तीन रंगांचा समावेश का आहे. ते रंग वापरण्यामागील कारण काय या साऱ्या गोष्टी वरुन आणि अनुष्का उलगडून सांगताना दिसतात. यावेळी वरुनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संपूर्ण देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आजचा दिवस प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी मौल्यवान आणि महत्वपूर्ण आहे. त्यामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचा कायम आदर केला पाहिजे’, असंही त्याने नमूद केलं आहे.