मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा 'देऊळ बंद' हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. २०१५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट अक्कलकोटचे 'श्री स्वामी समर्थ' महाराज यांच्या भक्तीवर आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर 'देऊळ बंद'चा सिक्वल यावा अशी अनेकांनी मागणी केली होती. विशेष म्हणजे पाच वर्षानंतर प्रविण तरडे यांनी 'देऊळ बंद'च्या सिक्वलची घोषणा केली असून लवकरच 'देऊळ बंद 2 ..आता परिक्षा देवाची', हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे यांनी ५ जुलै रोजी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या आगामी 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची घोषणा केली. यावेळी चित्रपटाचे निर्मातेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे रविवारी (४ जुलै) गुरुपौर्णिमा असल्याच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी अन्य कोणताही चांगला दिवस नसल्याचं म्हणत त्यांनी ही घोषणा केली आहे. "आज गुरुपौर्णिमेला आपण 'देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची' या नव्या चित्रपटाची घोषणा करतोय. या घोषणेसाठी आजच्या इतका दुसरा कोणता पवित्र दिवस नसावा",असं म्हणत प्रवीण तरडे यांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली. "आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण 'देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची' या नव्या चित्रपटाला सुरुवात करतोय आणि पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल", असं चित्रपटाच्या निर्मात्या जुईली वाणी- परदेशी यांनी सांगितलं.तसंच 'गेल्यावेळी स्वामींना शास्त्रज्ञ भेटले होते.यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे. हा सिनेमाही हिट होईल,' असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे करत असून निर्मिती जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट पुढच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच २३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्यापतरी या चित्रपटातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच आहेत. दरम्यान, यापूर्वी 'देऊळ बंद' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यामुळे या नव्या चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे.