अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांनी केवळ गैरवर्तनचं केलं नाही तर मला धमकीदेखील दिल्याचं तनुश्रीने सांगितलं आहे. तनुश्रीने केलेल्या या आरोपानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तिला पाठिंबा दिला असून तनुश्रीच्या बहीणीनेदेखील याविषयी तिचं मत मांडलं आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, ‘२००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी तनुश्रीसोबत गैरवर्तन केल्याची घटना खरी आहे. इतकंच नाही तर त्यांनी तिला धमकावल्याचंही तितकंच खरं आहे. कारण चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर तनुश्रीच्या गाडीवर करण्यात आलेली दगडफेक मी स्वत: पाहिली आहे’, असं तनुश्रीची बहीण इशिताने म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये ती बोलत होती.

पुढे ती असंही म्हणाली, ‘१० वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रचंड परिणाम झाला होता. शुटींग संपल्यानंतर तनुश्री घरी येत असताना काही नागरिकांनी तनुश्रीच्या गाडीला घेरलं होतं. गाडीच्या काचा फोडल्या होत्या. या प्रकरणाचा व्हिडिओ मी स्वत: पाहिला आहे. त्यावेळी हे पाहताना मी प्रचंड घाबरले होते. मात्र मी काहीच करु शकत नव्हते. माझी बहीण त्या परिस्थितीमध्ये एकटी अडकली होती. आजही तो दिवस आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो.तनुश्रीने भलेही आज एवढा काळ लोटल्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे. पण तीने बोलण्यास सुरुवात तरी केली आहे. तिला न्याय मिळेल न मिळेल ही नंतरची गोष्ट. परंतु, अशाच अडचणीत सापडलेल्या मुलींसाठी हे एक चांगलं उदाहरण आहे’.

दरम्यान, तनुश्रीने केलेल्या या खळबळजनक आरोपामुळे सध्या कलाविश्वामध्ये ही एकच चर्चा रंगली आहे. अनेकांनी तनुश्रीचं समर्थन केलं असून तिला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावत लवकरच तनुश्रीला कायदेशीर उत्तर देणार  असल्याचं म्हटलं आहे.