बॉलिवूडमधील दिग्गज निर्माते आनंद राय ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी करत आहेत. या मालिकेतील दोन चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिसऱ्या भागामध्ये चित्रपटातील कलाकारांमध्ये मोठा उलटफेर होणार असल्याचे वृत्त आहे. पहिल्या दोन भागामध्ये दिसलेली कंगणा रनौत आगामी चित्रपटामध्ये दिसणार नसल्याचे बोलले जात आहे. अर्थातच ‘तनु वेड्स मनु’ च्या तिसरा भागात आनंद राय नव्या चेहऱ्याला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आल्यास आश्चर्य वाटू नये. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे पहिल्या दोन चित्रपटाचे पटकथा लेखन करणारे हिमांशू शर्मा करणार असल्याची माहिती देखील समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू राय यांनी ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचा पहिला आरखडा देखील तयार केला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच कंगनाचा आगामी चित्रपटातून पत्ता कट करण्यात आल्याची चर्चा आहे.

‘तनु वेड्स मनु’ च्या पहिल्या दोन्ही भागामध्ये कंगना रनौतच्या सेटवरील वर्तणूकीमुळे पूर्ण टीमला त्रास सहन करायला लागला होता. ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ च्या चित्रिकरणावेळी कंगनाने तिच्या सहकाऱ्यांना पहिल्या चित्रपटापेक्षाही अधिक त्रस्त केले होते. दोन्ही चित्रपटात कंगनासोबत स्क्रिन शेअर केलेला आर माधवन देखील कंगनाच्या या स्वभावावर नाराज होता. त्यामुळे त्याने देखील या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये कंगनाला घेण्यास विरोध केल्याचे समजते.  मार्च २०१७ पर्यंत या चित्रपटाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नवीन निर्माते आणि दिग्दर्शकांना संधी देण्यासाठी आनंद राय यांना ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘रांझना’ चित्रपटाचे लेखक हिमांशु शर्मासोबत काम केल्यानंतर आनंद एल राय हिमांशूला आपल्या आगामी चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून समोर आणताना दिसणार असल्याचे आनंद यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. आनंद राय आणि  हिमांशू या जोडीच्या चित्रपटांना आतापर्यंत चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात निर्माता आनंद राय आणि दिग्दर्शक हिमांशू यांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे देखील ओत्सुकतेचे ठरेल.

अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘रंगून’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरची चर्चा थांबते न थांबते तोच चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला होता. ‘रंगून’ या बहुचर्चित ट्रेलरमधून ‘जानबाज जुली’च्या भूमिकेत दिसणारी कंगना अनेकांचेच लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली आओहे. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे.