झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. ४ वर्ष आणि १२०० एपिसोडचा टप्पा पूर्ण करताना मालिकेत नंदिता वहिनी परत येतेय, एक नवा ट्विस्ट घेऊन. कटकारस्थान, फसवेगिरी या सगळ्यात शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांची मालिकेत पुन्हा एण्ट्री होतेय. सोबत सूरज पण असणार आहे. आता या दोघांना राणादा आणि गोदाक्का घरात घेणार का, नंदिताच्या अरेरावी स्वभावाला जिजा कसं उत्तर देईल, हे येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत राणादाची भूमिका हार्दिक जोशीने साकारली आहे. तर अक्षया देवधरने पाठबाईंची भूमिका साकारली आहे.