बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतने हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यातच त्याच्या जवळच्या मित्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अश्रुंना वाट मोकळी केली आहे. त्याने सुशांतसोबतच्या मैत्रीचे काही किस्से सांगून मन मोकळं केलं आहे.

१५ तारखेला सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (१६ जून) अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंह यांनी सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर संदीपने एक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचं दिसून आलं.

“तुझ्या घरात प्रवेश केल्यानंतर मला गळ्यात पडून कडकडून मीठी मारायला कोणी नव्हतं. तिथे हसतं-खेळतं वातावरण नव्हतं. १० वर्ष आपण भावंडांप्रमाणे राहिलो, तू घेतलेल्या निर्णयामुळे मी खरंच आतून हादरलो आहे. मी मनातून तुटलो,नि:शब्द झालोय”, असं संदिपने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे तो लिहितो, “आपण एक कुटुंब असल्यासारखं ज्या प्रेमळ आठवणी, क्षण गोळा केले ते हरवले आहेत. आता कायम मला ते शोधावे लागतील. मी दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केल्यावर त्या चित्रपटात तू प्रथम काम करशील असं वचन तू दिलं होतं. आपण दोघंही बिहारी आहोत, त्यामुळे या कलाविश्वावर राज्य करु असंही म्हणाला होतास. पण तू सगळी वचन मोडलीस. तू मला फसवलं आहेस. मला एकटं पाडलंस तू”.

दरम्यान,सुशांतने केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर कलाविश्वामध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सुशांतने नैराश्य आल्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे.