बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी विनंती अभिनेता वरुण धवन याने केली आहे.

वरुणने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सुशांत मृत्यू प्रकरणाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्याती यावी अशी विनंती केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडे, कंगना रणौत, सुरज पंचोली, क्रिती सेनन, परिणीती चोप्रा यांनी देखील या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.