अभिनेता वरुण धवनने त्याच्या अभिनयाने आजवर अनेक चाहत्यांची मनं जिकली आहेत. कॉमेडीसोबतच त्याने ‘बदलापूर’ आणि ‘ऑक्टोबर’ सारख्या सिनेमातून त्याच्या अभिनयाचं वेगळेपण जपलं. असं असलं तरी अनेकदा वरुणला ट्रोलदेखील व्हावं लागलं आहे. ‘कुली नंबर १’ सिनेमामुळे वरुणला लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. गेल्या काही काळतील वरुणचे सिनेमा पाहता तो केवळ कॉमेडी आणि धमाल सिनेमांसाठी ओळखला जाऊ लागला आहे.

अनेकदा वरुण धवनसोबतच त्याचे वडिल आणि फिल्म मेकर डेविड धवन यांना देखील लक्ष्य केलं गेलं. मात्र एका मुलाखतीत वरुण धवनने त्याला वडिलांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नव्हती यावर खुलासा केला होता. वरुणला डेविड धवन यांच्या सिनेमातून लॉन्च होण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच वरुणने करण जोहरला पसंती दिली आणि करणच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या मुलाखतीत वरुणने त्याला वडिलांच्या सिनेमातून पदार्पण करण्याची इच्छा का नव्हती? या मागचं कारण सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन या मुलाखतीत म्हणाला, ” खरं तर मला माझ्या वडिलांनी लॉन्च करावं अशी माझी इच्छा नव्हती. मला बॉलीवूडमध्ये त्यांच्या सिनेमातून पदार्पण करायचं नव्हतं. करण जोहर आणि यश चोपडा हे नव्या चेहऱ्यांना आजवर लॉन्च करत आले आहेत. माझ्या वडिलांनी 40 सिनेमा बनवले मात्र त्यांनी आजवर एकाही नव्या चेहऱ्याला लॉन्च केलं नाही. मला आनंद आहे की मी करण जोहरसोबत डेब्यू केलं. माझे वडील आणि करण तर एकमेकांच्या संपर्कातही नसतात. दोघांच्या सिनेमांची स्टाइल आणि विषय वेगळे असतात. पण मी करणला जॉईन केलं याचा त्यांना आनंद झाला होता.” असं वरुणने या मुलाखतीत सांगितलं आहे.

वरुण धवनने ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘मे तेरा हिरो’, ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘ABCD’, ‘बदलापूर’, ‘जुडवा’ या सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तर वरुण सध्या अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.