Mumtaz Talks About Amitabh Bachchan : गेल्या काही काळात बॉलीवूड अभिनेत्री मुमताज त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये इंडस्ट्री आणि कलाकारांबद्दल बोलल्या आहेत. राजेश खन्ना यांच्याबरोबरचे चित्रपट असो किंवा शर्मिला टागोर यांच्याशी तुलना असो.

आता मुमताज यांच्या मुलाखतीचा एक नवीन भाग समोर आला आहे, ज्यामध्ये त्या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलल्या आहेत. अभिनेत्री म्हणाली की, अमिताभ इतक्या श्रीमंत कुटुंबातून आले होते की त्यांना अभिनेता होण्याची गरज नव्हती.

रेडिओ नशाने मुमताज यांच्या मुलाखतीचा एक नवीन भाग रिलीज केला आहे. अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. मुमताज म्हणतात, “बघा, मला चौथीत शाळा सोडावी लागली आणि मी चित्रपटांमध्ये अतिरिक्त कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. मी सात वर्षांची होते आणि आम्हाला एका भूमिकेसाठी ५०० रुपये मिळायचे, त्यापैकी १०० रुपये मला काम देणाऱ्या व्यक्तीला द्यावे लागायचे आणि उर्वरित पैसे मी माझ्या आईला द्यायचे. दुसरीकडे, अमिताभजी एक सुशिक्षित आणि उच्च दर्जाचे व्यक्ती होते. त्यांचे वडील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांचा बंगला आणि चांगले जीवन होते, त्यामुळे त्यांना अभिनेता होण्याची काय गरज होती हे मला समजत नाही.”

मुमताज-अमिताभ यांचा चित्रपट

मुमताज आणि अमिताभ जवळजवळ एकाच वेळी चित्रपटांमध्ये सक्रिय होते. दोघेही त्यांच्या काळातील टॉप अभिनेते होते. पण, तरीही दोघांनी फक्त एकाच चित्रपटात काम केले. ही जोडी १९७३ मध्ये आलेल्या ‘बंधे हाथ’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओपी गोयल यांनी दिग्दर्शित केला होता, जो बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नाही.

त्यांच्याबरोबर काम करण्याच्या दिवसांची आठवण करून देताना मुमताज म्हणाल्या, ” ते खूप श्रीमंत, प्रसिद्ध आणि सुशिक्षित होते. त्यांना काम करायचे होते. मी हो म्हटले आणि आम्ही तो चित्रपट बनवला. त्यांच्याबरोबर काम करून मला खूप आनंद झाला, ते खूप चांगले माणूस आहेत.”

सिनेसृष्टीपासून जवळजवळ ३५ वर्षे दूर असूनही बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री मुमताज यांचे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनत्रींपैकी एक म्हणून मुमताज यांना ओळखले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.