यशराज फिल्म्स बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित अशी चित्रपट निर्माण करणारी संस्था. साठ सत्तरच्या दशकापासून ते आजतागायत हजारो चित्रपट या संस्थेने निर्माण केले आहेत. संस्थेत सुरवातीला यश चोप्रा हे दिग्दर्शक आणि निर्माते अशा दोन्ही भूमिका बघत होते. त्यानंतर त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा ही जबाबदारी पार पाडत आहे. कधीकाळी सुपरहिट चित्रपट देणाऱ्या संस्थेचे गेले काही चित्रपट साफ आपटले आहेत. नुकताच येऊन गेलेला ‘शमशेरा’, ‘जयेश भाई जोरदार’ हे चित्रपट चालेले नाहीत. दिग्दर्शक अनुराग कश्यपने यावर आपले मत मांडले आहे.

अनुराग सध्या आपल्या दोबारा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत त्याने असे म्हंटले की, ‘यशराज फिल्म्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्रायल रूम इफेक्ट, तुम्ही एखादी कथा घेता त्याला ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ बनवण्याची तयारी करता आणि ठग्स ऑफ हिंदुस्थानसारखे चित्रपट तयार होतात. तुम्ही नंतर मॅड्मक्ससारखा चित्रपट बनवायला सुरवात करता आणि शमशेरासारखा चित्रपट तयार होतो. ज्या क्षणी तुम्ही दिग्दर्शनामध्ये पुढची वाटचाल करता तुम्ही स्वतःलाच फसवत असतात. शमशेरा २,३ वर्षांपूर्वी आला असता तर कदाचित यशस्वी झाला असता’.

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा पांडू सुपरहिट!! चित्रपटाला मिळाली ‘इतकी’ नामांकन

‘जयेशभाई जोरदारसारख्या चित्रपटात गुजराती संस्कृती दिसत नाही. चित्रपटाची कथा तयार होताना एक असते ती पूर्ण तयार झाल्यानंतर काहीतरी वेगळीच असते’. यशराज फिल्म्सच्या लागोपाठ फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांवर तो पुढे म्हणाला की, ‘तुमच्याकडे एक माणूस आहे जो गुहेत बसला आहे ज्याला बाहेरच्या जगाची माहिती नाही. जो दुसऱ्यांना सांगत असतो की चित्रपट कसा तयार केला पाहिजे. हे उघड आहे की तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा मारून घेत आहात. तुम्ही लोकांना सशक्त बनवा हुकूमशाही करणं बंद करा, ती वेळ आता निघून गेली आहे’.

‘जर आदित्य चोप्राने काही लोकांना कामावर ठेवले असेल, तर त्याने त्या लोकांना सशक्त करणे आवश्यक आहे. कलाकारांची निवडीवर तसेच प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायची गरज नाही. चांगल्या लोकांना कामावर ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा, आपण केलेल्या चुका त्यानं करायला सांगू नका’. अनुराग कश्यप आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी आणि मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे.