Bigg Boss Marathi 5 Fame Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेला स्पर्धक म्हणजे डीपी अर्थात धनंजय पोवार. आपल्या विनोदी स्वभावाने डीपीने अनेकांची मनं जिंकली. धनंजय सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपल्या आई व बायकोबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करतो. त्याच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो.

डीपी आणि त्याचं मटण प्रेम हे सर्वांनाच माहीत आहे. सोशल मीडियावरील काही व्हिडीओमधून त्याच्या प्रेक्षकांना ते अनेकदा पाहायला मिळालं आहे. यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. अशातच डीपी वारीत सहभागी झाल्यानंतर अनेकजण त्याला मटण खाण्यावरून ट्रोल करत आहेत आणि या ट्रोलर्सना डीपीने स्पष्ट शब्दांत उत्तरही दिलं आहे.

सध्या आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील अनेक वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले आहेत. या वारीत धनंजयही सहभागी झाला आहे. या पंढरपूरच्या वारीचे अनेक व्हिडीओ ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी त्याला मटण खाण्यावरुन आणि वारीत सहभागी होण्यावरुन ट्रोल केलं आहे. या ट्रोलर्सना धनंजयने पोस्ट शेअर करत थेट उत्तर दिलं आहे.

धनंजय पोवार इन्स्टाग्राम स्टोरी

धनंजय पोवारने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने असं म्हटलं आहे, “काही लोक वारी करताना किंवा देवाची भक्ती करताना इतरांच्या खाण्या-पिण्यावरुन किंवा व्यवसायावरून जज करतात. पण देव असं कधीच करत नाही. मटण खाणं ही माझी वैयक्तिक आवड आहे. पण माझं मन मात्र विठोबाच्या चरणी आहे. वारी शरीराने केली जाते, पण खरी वारी मनातली असते. देव कर्म बघत नाही, भाव बघतो.”

यापुढे तो असं म्हणतो, “विठोबा त्याच भक्तासाठी मटण तोडायला आला होता. देवाने भक्ताचा व्यवसाय बघितलं नाही, त्याची निष्ठा बघितली. मग तुम्ही कोण माझी भक्ती नाकारणारे? मी देवावर प्रेम करतो आणि हे प्रेम खाण्या-पिण्याच्या गोष्टींनी कमी होत नाही. देवाचं नाव घेणं कोणाच्याही मालकीचं नाही, कारण देव कोणाचाही द्वेष करत नाही. मग तुम्ही का करताय? मी मटण खातो, हो. पण रोज विठोबाचं नावही घेतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर डीपीने म्हटलं, “देव माझं हृदय बघतो, थाळीत काय आहे ते नाही. म्हणूनच मीही वारी करतो आणि अभिमानाने करतो! तू भक्त आहेस आणि भक्ती तुझ्या मनातून येते हे कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. पण तरी कुणी कमी लेखत असेल, तर हे उत्तर देणं, सत्यासाठी उभं राहणं आहे. देव तिथेच आहे, जिथे खरं मन आहे. बाकी सर्व लोकांचं बोलणं वारीनंतर वाऱ्यासारखं उडून जातं.”