Aamir Khan Reveals Dangal Not Released in Pakistan : बॉलीवूडचा ‘द परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानच्या काही गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘दंगल’ हा चित्रपट. २०१६ मध्ये ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘दंगल’ हा चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, ज्याने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. २३ डिसेंबर २०१६ रोजी जगभरात प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला नव्हता.
आमिरने सांगितलं ‘दंगल’ पाकिस्तानात प्रदर्शित न होण्यामागील कारण
याबद्दल स्वत: आमिरने आता खुलासा केला आहे. आमिर लवकरच त्याचा ‘सितारे जमिन पर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने तो ठिकठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच त्याने ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात ‘दंगल’ चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न होण्यामागील कारण सांगितलं आहे.
पाकिस्तानच्या सेन्सॉरने ‘दंगल’मधून राष्ट्रध्वज तिरंगा आणि राष्ट्रगीत काढण्याची केलेली मागणी
आमिरने सांगितले की पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने त्याला ‘दंगल’ चित्रपटातून भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आणि भारतीय राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगितले होते. आमिरने खुलासा केला की, ‘दंगल’ प्रदर्शित झाला तेव्हा डिस्ने चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाकिस्तानच्या सेन्सॉरने चित्रपटाच्या शेवटी ज्या दृश्यात गीता फोगाट सामना जिंकते, त्या दृश्यामधील भारतीय ध्वज आणि राष्ट्रगीत काढून टाकण्याची मागणी केली होती.”
आंकर खान म्हणला, “राष्ट्रध्वज तिरंगा आणि राष्ट्रगीत काढणं मला मान्य नाही”
याबद्दल आमिर पुढे म्हणाला, “हे कळल्यानंतर मी डिस्नेला एका क्षणात सांगितले की, आपला चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. यावर त्याने सांगितले की, खूप नुकसान होईल. त्याचा चित्रपटाच्या कमाईवरही परिणाम होईल. यावर मी त्याला उत्तर देत म्हणालो की, आम्हाला राष्ट्रध्वज काढून टाकण्यास सांगतील आणि जे आम्हाला आमचं राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगतील ते मला ते मान्य नाही. मला असा व्यवसाय नको.”
आमिर खानच्या आगामी ‘सितारे जमिन पर’बद्दल थोडक्यात
दरम्यान, सध्या आमिर खान त्याच्या आगामी ‘सितारे जमिन पर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात आमिर खानसह अभिनेत्री जिनिलिया देशमुखदेखील मुख्य भूमिकेत आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भानुशाली आणि आशीष पेंढसे, ऋषी शहाणी, ऋषभ जैन, नमन मिश्रा, सिमरन मंगेशकर असे नवोदित कलाकार आहेत.