आमिर खान, शाहरुख खान व सलमान खान हे तिघे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. या त्रिकुटाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. तिघांमध्ये असलेली मैत्री, त्यांच्यातील स्पर्धा याबद्दल अनेकदा बोललं जातं. परंतु, हे तिघे कायमच एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. माध्यमांशी बोलतानाही एकमेकांचं कौतुक करताना दिसतात; तर तिघेही केवळ एकमेकांचे स्पर्धक नाहीत तर त्या पलीकडे जाऊन चांगले मित्रही असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आमिर खानने शाहरुख खान व सलमान खान यांच्या चित्रपटांबद्दल वक्तव्य केलं आहे. आमिरला “सलमान व शाहरुख यांचे आवडलेले चित्रपट कोणते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना आमिर म्हणाला, “सलमान खानचे मला आवडलेले चित्रपट म्हणजे ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘दबंग.’ तर शाहरुख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मला खूप आवडला होता. यासह त्याचा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपटसुद्धा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. त्याचे नुकतेच येऊन गेलेले ‘पठाण’ व ‘जवान’ हे सिनेमे मी पाहिलेले नाही.”
आमिर खानने मागे सलमान खान, शाहरुख खान व तो एकत्र एका चित्रपटात काम करू शकतात, अशी शक्यता वर्तवली होती. आमिर खानने शाहरुख व सलमान दोघांची याकरिता भेट घेतली असून, त्यांच्याकडे आपण इतकी वर्ष या इंडस्ट्रीत काम करत आहोत, त्यामुळे जर एकाही चित्रपटात आपण एकत्र काम करू शकलो नाही तर प्रेक्षकांच्या दृष्टीने हे याग्य नसेल; असं म्हणत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं सांगितलं होतं. यापूर्वी आमिर खानने सांगितलं होतं की, त्याला शाहरुख खान व सलमान खानसह एकत्र काम करायला आवडेल. आम्ही एक चांगली कथा असलेल्या चित्रपटाची वाट पाहत आहोत. मला असं वाटतं, प्रेक्षकांनाही आम्हाला तिघांना एका चित्रपटातून पाहण्याची इच्छा आहे, त्यामुळे जर एखादी चांगली कथा असलेल्या चित्रपटासाठी विचारणा झाली तर आम्ही नक्की त्यामध्ये काम करू.
दरम्यान, आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. येत्या २० जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आमिरने राज शामानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो त्याचं ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम करणार आहे; तर हा कदाचित त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो, असंही त्याने म्हटलं होतं.