Abhishek Bachchan Recalls Agneepath Movie Incident : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय चित्रपट दिले. त्यापैकी काही हिट झाले, तर काही फ्लॉपही झाले. मात्र, त्यांच्या फ्लॉप चित्रपटांचीही बरीच चर्चा झाली होती. असाच एक चित्रपट म्हणजे ‘अग्निपथ’. या चित्रपटानं म्हणावं तसं व्यावसायिक यश मिळवलं नाही; पण या चित्रपटाची, त्यातील अमिताभ यांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा झाली होती.
या चर्चेचं आणखी एक कारण म्हणजे चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी चित्रपटगृहं उद्ध्वस्त केली होती. ते का? तर या चित्रपटातला अमिताभ बच्चन यांचा आवाज प्रेक्षकांना आवडला नव्हता. ‘अग्निपथ’ चित्रपटातील अमिताभ यांची विजय दीनानाथ चौहान ही भूमिका चांगलीच गाजली होती; मात्र या भूमिकेसाठी त्यांनी विशेष आवाज वापरला होता.
अग्निपथ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा अमिताभ यांचा चित्रपटातील बदललेला आवाज ऐकून प्रेक्षक संतापले आणि त्यांनी चित्रपटगृहांचं नुकसान केलं. अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चननं नुकतीच या संपूर्ण घटनेबद्दलची आठवण सांगितली. यावेळी त्यानं सांगितलं की, चित्रपटात अमिताभ यांचा बदललेला आवाज ऐकून प्रेक्षक इतके संतापले की, त्यांनी चित्रपटगृहांमधल्या खुर्च्या आणि साऊंड सिस्टीमचं नुकसान केलं होतं.
अग्निपथ पाहून प्रेक्षकांनी साउंड सिस्टीमचं केलेलं नुकसान
इंडिया टुडेशी बोलताना अभिषेक म्हणाला, “जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा असं वृत्त येऊ लागलं की, लोक चित्रपटगृहांमधील साउंड सिस्टीम तोडत आहेत. प्रेक्षकांना वाटलं की, अमिताभ यांच्या आवाजाला अचानक काय झालं आहे? त्यांना वाटलं की, स्पीकर्स बंद आहेत. अमिताभ बच्चन हे त्यांच्या एका विशिष्ट आवाजासाठी ओळखले जातात आणि म्हणूनच प्रेक्षकांना तेव्हा त्यांचा नवीन आवाज स्वीकारणं कठीण गेलं.”
पुढे अभिषेक म्हणाला, “चित्रपटाचे निर्माते यश जोहर यांना याबद्दल काहीतरी करायला हवं असं वाटलं आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण चित्रपट पुन्हा डब करण्याचा निर्णय घेतला. मला आठवतंय की, तेव्हा एका शुक्रवारी रात्री अमिताभ डबिंग स्टुडिओमध्ये गेले होते; ते थेट शनिवारी सकाळी ८ वाजताच स्टुडिओमधून बाहेर पडले. तेव्हा त्यांच्याबरोबर मीसुद्धा होतो. ते संपूर्ण रात्र तो चित्रपट डब करत होते.”
दरम्यान, या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांनंतरही, ‘अग्निपथ’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटानं तेव्हा १० कोटींची कमाई केली होती आणि चित्रपटाचं एकूण बजेट २७ कोटी होतं. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटातील अमिताभ यांच्या अभिनयाला मात्र चांगलीच पसंती मिळाली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.