प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते नेहमीच समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर मुक्तपणे व्यक्त होताना दिसतात. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याबद्दलही त्यांनी त्यांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशातच अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे आणि स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला दहशतवादाचा बळी असल्याचे म्हटलं.

इंडिया टुडेशी विशेष बोलताना, अभिनेते-दिग्दर्शक यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. तसंच २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात मृत पतीच्या शेजारी बसलेल्या एका महिलेची दुःखद दृश्ये पाहिल्यानंतर, खेर यांनी असहाय्यतेऐवजी राग आल्याची भावना व्यक्त केली आणि म्हटले की, या दुःखद प्रतिमा पाहून त्यांना सामान्य भारतीयाप्रमाणे राग आला.

याबद्दल ते म्हणाले, “मी दहशतवादाचा बळी आहे. माझे कुटुंब दहशतवादाचे बळी आहे. ३२ वर्षांपासून, काश्मिरी पंडितांच्या बाबतीत काहीच बदललेलं नाही, ज्यांना ज्यांना १९ जानेवारी १९९० रोजी एका रात्री आपले घर सोडावे लागले. आणि मग, कलम ३७० रद्द झाल्यानंतर, असेच काहीतरी घडत आहे. याबद्दल मला असहाय्य वाटणे थांबले आहे. मी एका महिलेचा तिच्या मृत पतीजवळ बसलेला फोटो पाहतो; तेव्हा मला सामान्य भारतीयांसारखा राग येतो.”

पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून सरकारने केलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक करताना ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या सरकारकडून किंवा तुमच्या नेतृत्वाकडून कारवाईची अपेक्षा करता आणि जेव्हा त्यांनी ते केले तेव्हा मला योग्य वाटले. ते योग्य आहे की, नाही हे मला माहित नाही, परंतु मला असे वाटले की असंच घडायला हवं होतं. लोकांचे अनेक तर्क-वितर्क आहेत, परंतू, आता आम्हाला तो हल्ला किती अचूक होता हे कळत आहे.”

पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केल्याबद्दल अनुपम खेर यांनी आपल्या भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक केले. याबद्दल ते म्हणाले, “आपल्या सैन्याने किती अद्भुत काम केले, गुप्तचर यंत्रणांनी त्यांचं काम अगदी चोख केलं याबद्दलचे निर्णय एक उत्तम नेतृत्वच घेतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे ते म्हणाले, “दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडले, तेव्हाच्या नेतृत्वाने त्या हल्ल्याबद्दल काहीही केले नाही आणि ते दुर्दैवी होते. आता आपल्याला माहिती आहे की, आपल्याकडे असे लोक आहेत, जे या गोष्टी कधीच गृहीत धरणार नाहीत.”