बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या व्यावसायिक जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यातही खूप सक्रिय असतात. ते दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर भुतकाळाच्या आठवणीत रमल्याचे दिसून येत आहे. अशातच अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टग्रामवर अकांऊटवर त्यांचे जुने मित्र दिवंगत अभिनेते अमरीश पुरींबरोबरचा एक जूना व्हिडिओ शेअर केला आहे. हा एक स्टेज शो व्हिडिओ आहे. या व्हिडिओत दोघेही एक गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनुपम खेर यांना आजही ९० च्या दशकातील ते दिवस आठवतात. तो काळ होता जेव्हा कलाकार एकमेकांची खूप चेष्टा करायचे आणि रागावायचेही नाही. एकदा अनुपम खेर आणि अमरीश पुरी यांनी एकमेकांचीच नव्हे तर इतर टक्कल पडलेल्या लोकांचीही खिल्ली उडवली होती. अनुपम खेर यांनी त्यांच्या ‘यादों के पुलिंदे’ मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते आणि अमरीश पुरी एका गाण्याच्या माध्यमातून टक्कल पडलेल्या लोकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका स्टेज शोचा आहे, ज्यामध्ये अमरीश पुरी आणि अनुपम खेर गाणे गाताना स्टेजवर उभ्या असलेल्या टक्कल असणाऱ्या माणसांची खिल्ली उडवत आहेत.
‘या’ गाण्याने उडवली जायची टक्कल पडललेल्या लोकांची खिल्ली
अमरीश पुरी आणि अनुपम खेर यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले गाणे असे आहे, तू नहीं तो कंघा तेल सब बेकार है। सर्दी सिर पे लगती है मुझे बुखार है। सर चमक चमके कह रहा। तू अब आ भी जा। तू हमको गंजा ना बना। तुझे कसम है आ भी जा।’ हा व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, ‘यादों के पुलंदों से: हे गाणे अनेक वर्षांपूर्वी एका स्टेज शोमध्ये गायले होते!! टक्कल पडलेल्या लोकांची चेष्टा केली. अमरीशजींच्या हसण्यात खूप निरागसता होती. चित्रपटांमधील नातेसंबंधांचा हा सुवर्णकाळ होता. सहज नाती तयार झाली. आणि ती आयुष्यभर चालायची.
चाहत्यांची भावनिक मागणी
अनुपम खेरचा हा व्हिडीओ पाहून चाहते जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले आणि अमरीश पुरी यांची आठवण येऊ लागली. चाहत्यांनी अनुपम खेर यांना व्हिडीओ बनवून अमरीश पुरीसोबत त्यांच्या गोष्टी शेअर करण्याची मागणी केली. यासोबतच अमरीश पुरीसारख्या दिग्गज अभिनेत्याला चित्रपटसृष्टी सहज विसरली आणि त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाही, अशी खंतही चाहत्यांनी व्यक्त केली.
अमरीश पुरी आणि अनुपम खेर यांचे हिट चित्रपट
अमरीश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. त्यांना ब्लड कॅन्सर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमरीश पुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते आणि खलनायक मानले जातात. अमरीश पुरी आणि अनुपम खेर यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये खलनायक आणि मित्राच्या भूमिका साकारल्या आहेत. काही चित्रपटांमध्ये ते एकमेकांच्या विरुद्धही होते. पण खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. अनुपम खेर आणि अमरीश पुरी यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘जीने दो’, ‘सलाखें’, ‘त्रिदेव’, ‘आज का अर्जुन’, ‘त्रिनेत्र’ आणि ‘झूठ बोला कव्वा काटे’ सारखे हिट चित्रपट दिले.