बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे, तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor) आपल्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांचा भाग बनला आहे.

अर्जुन कपूरने पोस्टमध्ये काय लिहिले?

अर्जुन कपूरने नुकतीच सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, “सकारात्मक असणे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुम्हाला हव्या तशा घडतील असे नाही; तर गोष्टी कशाही घडू देत, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही व्यवस्थित राहणार आहात, तुम्ही ठीक राहणार आहात हे माहीत असणे म्हणजे सकारात्मकता होय.” आता अर्जुन कपूरने पोस्ट केलेल्या या ओळींंचा संबंध त्याच्या आणि मलायका अरोराच्या नात्याबद्दल आहे, असा अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता अर्जुनने केलेली पोस्ट हे जोडपे विभक्त झाल्याकडे इशारा देत नाही ना? असे सोशल मीडियावर म्हटले जाऊ लागले आहे.

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलीवूडचं लोकप्रिय जोडपं आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. वयात १२ वर्षांचे अंतर असल्यामुळे मलायका आणि अर्जुनला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळाले आहे. अर्जुन आणि मलायकाने जेव्हा २०१८ मध्ये एका फॅशन शो कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी, त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याबद्दल स्पष्टता दिली होती.

हेही वाचा: शाही विवाहसोहळ्यानंतर अनोख्या पद्धतीने अनंत-राधिकाचे रिसेप्शन; कर्मचारी म्हणाले…

मलायका अरोराने १९९८ साली अरबाज खान बरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, १९ वर्षांनंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर अर्जुन आणि मलायका यांनी डेट करायला सुरुवात केली. आता अर्जुन कपूरच्या पोस्टमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. करीना कपूर, दीपिका पदुकोण, अजय देवगण, रणवीर सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच अभिनेता ‘नो एन्ट्री-२’ या चित्रपटातदेखील झळकणार आहे.