मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं राधिका मर्चंटशी जुलै २०२४ मध्ये लग्न झालं. या लग्नाची जवळपास ४ महिने खूप चर्चा होती. दोन प्री-वेडिंग आणि त्यानंतर थाटामाटात मुंबईत पार पडलेला लग्नसोहळा चर्चेचा विषय होता. अनंत-राधिकाच्या लग्नात बॉलीवूड अवतरलं होतं. अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांच्याबरोबरच सलमान खान व इतर सर्व आघाडीचे स्टार्स या लग्नाला उपस्थित होते.

मुकेश अंबानी यांनी अनंतच्या मित्रांना तसेच अभिनेता शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांना ऑडेमार्स पिग्युट लिमिटेड-एडीशन लक्झरी घड्याळं भेट म्हणून दिली होती. प्रत्येक घड्याळाची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त होती. अनंत-राधिका यांच्या लग्नातील या घड्याळाचा एक फोटोदेखील खूप व्हायरल झाला होता.

द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मिकाने ते महागडं घड्याळ न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “मी अनंत अंबानींच्या लग्नात परफॉर्म करायला गेलो होतो. त्यांनी प्रत्येकाला भरपूर पैसे वाटले, अगदी मलाही. पण मला एका गोष्टीची नाराजी आहे. त्यांच्या काही जवळच्या लोकांना जे घड्याळ मिळालं ते मला मिळालं नाही,” असं मिका म्हणाला. जर अनंत अंबानीने ही मुलाखत पाहिली तर मला ते महागडं घड्याळ भेट देण्याचा विचार करावा, असं मिकाने म्हटलं.

मिका सिंगला अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी त्याला खूप जास्त मानधन मिळालं, मात्र अंबानींनी त्याला महागडं घड्याळ भेट न दिल्याने तो नाराज आहे. अंबानी कुटुंबाने अनंतचे जवळचे मित्र आणि बॉलीवूडमधील निवडक लोकांना दोन कोटी रुपये प्रत्येकी किंमत असलेले घड्याळ भेट दिले होते.

anant radhika
अनंत अंबानी व राधिका मर्चंट (फोटो – इन्स्टाग्राम)

मिका सिंगला अनंत-राधिकाच्या लग्नात किती पैसे मिळाले?

अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म केल्यावर मिळालेल्या मानधनाचा आकडा मिकाने सांगितला नाही. पण त्या पैशांत तो पुढील पाच वर्षे आरामात जगू शकतो, असं त्याने सांगितलं. “खरं तर मला खूप जास्त मानधन दिलंय, पण रक्कम मी सांगू शकत नाही. तुम्हाला अंदाज यावा यासाठी सांगतो की मला इतके पैसे मिळालेय, ज्यात मी पाच वर्षे सहज जगू शकेन. माझा फार खर्च नाही. त्यामुळे मी त्या पैशातून पाच वर्षे आरामात राहू शकतो,” असं मिका म्हणाला.

लग्न, पार्ट्या यासारख्या खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करून कलाकार पैसे कमवतात, याबद्दलही मिकाने त्याचं मत मांडलं. मिका स्वतःचा व त्याचा भाऊ दलेर मेंहंदी यांचे उदाहरण देत म्हणाला, “आम्ही दोघे भाऊ जेव्हा लग्नात गायचो तेव्हा लोकांना वाईट वाटायचं की आम्ही लग्नात गातो. पण आता प्रत्येकजण लग्नात गातोय. कोणीही मोठ्या शोमध्ये जाऊन परफॉर्म करत नाही. आता सगळे लग्नात गातात आणि पैसे कमवतात.”