Madhuri Dixit : १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून अभिनेत्री माधुरी दीक्षितने कलाविश्वात पदार्पण केलं. बॉलीवूडमध्ये आल्यावर सुरुवातीचा काही काळ तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र, त्यानंतर आलेल्या ‘तेजाब’ने बॉलीवूडवर एक वेगळीच जादू केली. रातोरात माधुरी सुपरस्टार झाली. केवळ अभिनयाने नव्हे तर तिने आपल्या नृत्याने सुद्धा लाखो चाहत्यांना घायाळ केलं.

‘खलनायक’, ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल हैं’, ‘साजन’ अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये ती झळकली. दमदार अभिनयासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवले. मात्र, १९९९ मध्ये करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने अचानक अमेरिकेला गेल्याने तिचे लाखो चाहते नाराज झाले होते. यानंतर देखील माधुरीने काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. पण, हळुहळू तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहून कुटुंबीयांवर लक्ष केंद्रीत केलं.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर अर्जुन व्यक्त करणार प्रेम! सायलीसाठी लिहिणार खास चिठ्ठी, पण ‘ते’ पत्र वाचून…; पाहा मालिकेचा प्रोमो

माधुरीने याबद्दल ‘गलाट्टा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “मी खूप खूश आहे कारण, भौतिक सुखापेक्षा मला माझी माणसं, माझं कुटुंब जास्त महत्त्वाचं आहे. मला अभिनय करायला आवडतो, नृत्य आवडतं…एकंदर माझ्या कामाशी संबंधित सगळ्या गोष्टी मला आवडतात. लोक मला स्टार अभिनेत्री मानतात हे माझं खरंच भाग्य आहे. पण, मला स्वत:ला याबद्दल कधीच काही वाटलं नाही. मला कधीच असं जाणवलं नाही की, अरे देवा…मी लोकांपासून आता दूर जातेय…करिअरच्या शिखरावर असताना मी लग्न करतेय या सगळ्या गोष्टींचा मी कधीच विचार केला नाही.” असं माधुरीने स्पष्ट केलं.

माधुरी पुढे म्हणाली, “मला असं वाटतं, मला आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली. श्रीराम नेने हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं. कारण, काम करत असताना आपली स्वत:ची सुद्धा अनेक स्वप्नं असतात. माझ्यासाठी माझं घर, नवरा, माझी मुलं, सगळे कुटुंबीय एकत्र माझ्याबरोबर असणं हे माझं स्वप्न होतं. जे मी पुरेपूर जगले.”

“आज जेव्हा लोक विचारतात अरे तू दूर होतील..तुला चुकल्यासारखं वाटत नाही का? मला असं काहीच नाही वाटत कारण, मी माझं स्वप्न जगत होती.” असं माधुरीने सांगितलं.

हेही वाचा : सूरज चव्हाणने अशोक सराफ यांना दिल्या गुलीगत शुभेच्छा; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “झापूक झुपूक पॅटर्नमध्ये…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लग्नानंतर अमेरिकेला गेल्यावर अभिनेत्री २०११ मध्ये आपला नवरा व दोन्ही मुलांसह भारतात परतली. १९९९ ते २०१३ दरम्यान तिने ‘लज्जा’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘देवदास’, ‘आजा नचले’ असे अनेक चित्रपट केले. भारतात कायमस्वरुपी परतल्यावर माधुरीने ‘ये जवानी है दिवानी’ मधील ‘घागरा’ या डान्स नंबरमधून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं होतं.