करोनानंतरचा काळ हा बॉलीवूडसाठी खूप कठीण काळ ठरला. गेल्या दोन वर्षांत अनेक बॉलीवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. यामुळे अनेक सुपरस्टार्सच्या चित्रपटांनाही फटका बसला. आयुष्मान खुराना, अक्षय कुमार, आमिर खान यांचे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले. आता या सर्वावर बॉलीवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीने भाष्य करत प्रेक्षकांची बाजू घेतली आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मनोरंजनसृष्टीची कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना तिने या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. आतापर्यंत तिने केलेल्या सर्व भूमिकांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. तर सध्याच्या बॉलीवूडमधील परिस्थितीवर तिने आता मोकळेपणाने भाष्य केलं आहे. वाईट कथा असलेल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली पाहिजे, असं ती म्हणाली आहे.
हेही वाचा : “सारखा सारखा एकच ड्रेस परिधान करतेस…,” ट्रोलरच्या कमेंटला बिग बींच्या नातीने दिलं चोख उत्तर; नव्या म्हणाली…
‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नुसरत म्हणाली, “करोना काळानंतर प्रेक्षकांच्या आवडीनिवडी खूप बदलल्या. या काळामध्ये प्रेक्षकांनी जगभरातील कलाकृती ओटीटीवर पाहिल्या. त्यामुळे कोणत्याही कलाकृतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. आता ते कलाकारांपेक्षा कथेला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. आता प्रेक्षक जाणकार झाले आहेत. आधी प्रेक्षक पाचच हिरोंच्या मागे धावायचे. आता पंचवीस हिरो झाले असल्याने त्या पाच हिरोंचं महत्त्व कमी झालं आहे आणि हीच सध्याची परिस्थिती आहे. आता प्रेक्षकांना कलाकृतींमध्ये बरीच व्हरायटी मिळते. या आधी ज्या प्रकारची कथानकं प्रेक्षकांसमोर आणली जायची, ती आता प्रेक्षकांना नको आहेत.”
पुढे ती म्हणाली, “गेल्या काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांनी अनेक बड्या चित्रपटांकडे पाठ फिरवली, पण त्यांच्या या भूमिकेने मी आनंदी झाले आहे. कारण मला असं वाटतं की, जे चित्रपट चांगले नाहीत त्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीच पाहिजे आणि जे चित्रपट चांगले आहेत, भलेही त्यांची स्टारकास्ट नवीन असो; प्रेक्षकांनी ते पाहिले पाहिजेत. जर प्रेक्षकांनी चांगल्या चित्रपटांना पाठिंबा दिला नाही, तर चांगले चित्रपट तयारच होणार नाहीत. त्यामुळे जे चित्रपट चांगले नाहीत, ते पाहू नका.” आता नुसरतचं हे बोलणं चांगलंच चर्चेत आलं आहे.