संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली. काहींना हा चित्रपट आवडला तर अनेकांनी त्यावर टीकाही केली. जावेद अख्तर आणि स्वानंद किरकिरे यांनीही ‘अ‍ॅनिमल’वर टीका केली. हिंसाचार आणि महिलांबद्दलच्या दृष्टिकोनापासून ते गैरवर्तन आणि वादग्रस्त संवादांपर्यंत चित्रपटात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या ज्यांची चांगलीच चर्चा झाली.

नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. दरम्यान चित्रपटातील कलाकार रणबीर कपूर, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनी या ओटीटी प्रदर्शनानिमित्त कॉमेडीयन अनुभव बस्सीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने चित्रपटावर होणाऱ्या टिकेबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा : ‘पुष्पा २’च्या कथेबद्दल नवी अपडेट; आजवर कधीही न केलेली ‘ही’ गोष्ट अल्लू अर्जुन करणार मोठ्या पडद्यावर

रणबीर या मुलाखतीदरम्यान म्हणाला, “या चित्रपटामुळे किमान विषारी पुरुषत्वाबद्दल चर्चा तर व्हायला सुरुवात झाली. जर एखादी चुकीची गोष्ट होत असेल अन् तुम्ही ती त्या चित्रपटात दाखवत नसाल तर ती फार चुकीची गोष्ट आहे. जोवर या विषयांवर चर्चा किंवा संभाषण होत नाही तोवर आपल्याला या गोष्टींची जाणीव होणार नाही. आम्ही ज्या प्रकारच्या भूमिका निभावतो त्यांच्याबद्दल सहानुभूति निर्माण होणं आमच्यासाठी महत्त्वाचं असतं, पण प्रेक्षक म्हणून काय चूक व बरोबर हे ठरवायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही एखाद्या वाईट माणसावर चित्रपट काढू शकता, त्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर तुम्ही त्यांच्यावर चित्रपट काढला नाही तर समाजात सुधारणा होणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीरच्या म्हणण्याला बॉबीने दुजोरा दिला, तो म्हणाला, “चित्रपट हा समाजाचा आरसाच असतो. जे समाजात घडतं तेच चित्रपटात दाखवलं जातं अन् अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याबद्दल आपण एक चकार शब्दही काढत नाही.” ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींहून अधिक कमाई केली.