अभिनेत्री कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत १४ ऑगस्टला पार पडला. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी पत्रकार परिषददेखील पार पडली. यावेळी अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारलेल्या अभिनेता श्रेयस तळपदे याने कंगना रणौतविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे.

काय म्हणाला श्रेयस तळपदे?

श्रेयस तळपदेने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. जेव्हा कंगना रणौत यांनी त्याला या भूमिकेसाठी विचारले होते, त्यावेळी त्याची प्रतिक्रिया काय होती. त्याबाबत बोलताना श्रेयस म्हणतो, “ज्यावेळी कंगना रणौत यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी मला विचारले होते, त्यावेळी त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला कळत नव्हते. त्यांनी मला कोणत्या भूमिकेसाठी विचारले आहे. हा प्रोजेक्ट घ्यावा की सोडून द्यावा, असा विचार मी करीत होतो. कारण- मी गोंधळलेला आणि घाबरलेला होतो; त्यांच्यावर इंडस्ट्रीने बहिष्कार टाकला आहे म्हणून नाही. जर त्या नसत्या, तर ही भूमिका साकारणे त्याच्यासाठी सोपे नसते, असेही अभिनेत्याने म्हटले आहे.

पुढे कंगना रणौत यांचे कौतुक करताना श्रेयस तळपदेने म्हटले, “त्या हुशार असून, माझ्यासाठी प्रेरणा आहेत. याआधी एक कलाकार म्हणून मी त्यांचे काम पाहिले होते; जेव्हा मी त्यांना ‘इमर्जन्सी’च्या सेटवर पाहिले. ज्या प्रकारे त्या स्वत:ला एखाद्या भूमिकेसाठी तयार करतात, ते कौतुकास्पद आहे. त्यांनी फक्त स्वत:च्या भूमिकेचा अभ्यास केला नव्हता, तर मी साकारत असलेल्या भूमिकेचादेखील अभ्यास केला होता.

हेही वाचा: Video : ऐश्वर्या नारकरांचा ए. आर. रेहमान यांच्या तमिळ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

कंगना दिग्दर्शक म्हणून कशा आहेत, याचा किस्सादेखील श्रेयस तळपदेने यावेळी सांगितला. तो म्हणतो, “या चित्रपटाच्या शूटिंगआधी आम्ही सराव करायचो; पण शूटिंगदरम्यान मी माझ्या बाजूने अधिक काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचो. त्यावेळी कंगना माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला कानात सांगितले की, आपण जे सरावादरम्यान केले आहे, तेच इथेपण कर.” पुढे त्याने विनोद करीत म्हटले, “त्या ज्या प्रकारे विविध गोष्टी एकाच वेळी करत असतात, ते पाहून मला वाटते. जर उद्या पुष्पा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिसरा भाग आणायचे ठरवले, तर मला वाटते त्यांनी कंगना रणौत यांना कास्ट करावे. कारण- ‘झुकेगा नही साला कभी भी’, असे श्रेयसने हसत म्हटले.

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीतील पुष्पा राजच्या भूमिकेसाठी श्रेयस तळपदेने डबिंग केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कंगना रणौत यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता प्रेक्षकांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.