गोविंदा हे ९० च्या काळातील गाजलेलं नाव. एकानंतर एक हिट चित्रपट देणारा गोविंदा आता बॉलीवूडमधील कुठल्याही चित्रपटात पाहायला मिळत नाही. २०१९ पासून तो कुठल्याही चित्रपटात झळकलेला नाही. अशातच अभिनेत्याची बायको सुनीता आहुजाने नुकतच गोविंदाच्या करिअरबद्दल आणि सध्याच्या त्याच्या वागण्याबद्दल सांगितलं आहे. सुनीता म्हणाली, गोविंदा चुकीच्या माणसांच्या संगतीत आहे, जे त्याला पुढे जाऊ देत नाहीयेत.

‘द पावरफुल ह्युमन्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनीता म्हणाली, “तो गेल्या १७ वर्षांमध्ये का दिसला नाही, कारण त्याची संगतच चुकीची आहे. तो चुकीच्या माणसांच्या सहवासात असतो आणि माझं त्याच्याबरोबर भांडण होण्यामागचं कारणही हेच आहे की मी खरं बोलते; मी उगाच खोटं बोलून त्याच्या मनाचं समाधान व्हाव असं काही करत नाही.” पुढे गोविंदाच्या संगतीबद्दल बोलताना त्याची बायको म्हणाली, “त्याच्याबरोबर चार माणसं असतात. एक लेखक, एक गायक, एक त्याचा सेक्रेटरी आणि एक वकील, जे काहीच कामाचे नाहीत. ते फक्त त्याने जर गाणं गायलं, काही लिहिलं तर त्याचं खोटं कौतुक करतात. त्यांनी त्याला सत्य सांगायला हवं, त्यामुळे जेव्हा मी त्याला सत्य परिस्थिती सांगते तेव्हा त्याला वाईट वाटतं.”

सुनीता पुढे म्हणाली, “मी गोविंदाला सांगत असते की ९० चा काळ संपला आहे, हे २०२५ आहे. त्यामुळे आता ओटीटीवर काय चालतंय ते बघ, तुझी संगत बदल. जोवर तू त्याच चार-पाच माणसांबरोबर राहशील, तोपर्यंत ते तुला पुढे जाऊ देणार नाहीत.” गोविंदा चुकीच्या माणसांच्या संगतीत असल्याने ते त्याला पुढे जाऊ देत नाहीत. तसेच तो आजही ९० च्या काळात अडकून राहिला असल्याचं अभिनेत्याच्या बायकोने सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गोविंदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आजवर ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर १’, ‘दिवाना मस्ताना’, ‘दुल्हे राजा’, ‘बडे मिया छोटे मिया’, ‘अनारी नंबर १’, ‘हसिना मान जायेगी’, ‘जोडी नंबर १’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याकाळी गोविंदाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ होती; तर त्याने त्याच्या अभिनयाने अनेकांचं मनोरंजन केलं आहे.