Vivek Oberoi Aishwarya Rai Affair : सलमान खान व ऐश्वर्या रायचं ब्रेकअप विवेक ओबेरॉयमुळे झालं, असं म्हटलं जातं. ऐश्वर्या व विवेकची जवळीक बॉलीवूडमध्ये खूप चर्चेचा विषय ठरली होती. विवेकला ऐश्वर्यामुळे सलमान खानच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं. ऐश्वर्यावर प्रेम केल्याने एकेकाळी बॉलीवूडचा चॉकलेट बॉय असलेल्या विवेकच्या करिअरवर मोठा परिणाम झाला.

विवेक ओबेरॉय हा ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा होय. ‘अॅनिमल’ फेम सुरेश ओबेरॉय यांनी एकदा मुलगा अभिनेता विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय यांच्या अफेअरबद्दल प्रतिक्रिया दिली होती. विवेकच्या नात्याबद्दल काहीही माहिती नव्हती, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने दोघांबद्दल सांगितलं होतं, असं सुरेश ओबेरॉय म्हणाले होते. सुरेश यांनी सलमान व त्याच्या कुटुंबाशी असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं.

विवेक ऐश्वर्याबद्दल कोणी सांगितलं?

‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत सुरेश विवेक व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल म्हणाले, “मला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. विवेकने मला त्याबद्दल कधीच सांगितलं नव्हतं. रामूने (राम गोपाल वर्मा) मला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. रामूच्या आधी मला अजून कुणीतरी सांगितलं होतं, त्यावेळी मी विवेकला समजावलं होतं की हे सगळं करू नकोस.”

सलमान खानबद्दल सुरेश ओबेरॉय काय म्हणाले?

सुरेश ओबेरॉय यांनी सलमान खान व सलीम खान यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. “मी त्यावेळी आणि आताही विवेकच्या प्रकरणात निश्चिंत आहे. आम्ही सगळे एकमेकांना खूप छान भेटतो. जेव्हाही सलमान खान मला भेटतो तेव्हा तो सिगारेट लपवतो आणि नंतर आदराने माझ्याशी बोलतो. मी नेहमी विवेकला सलीमजींच्या पाया पडायला सांगतो. मी सलीम भाईंचा आदर करतो. काही गोष्टी घडल्या पण माझे त्यांच्याशी संबंध चांगले आहेत,” असं सुरेश ओबेरॉय म्हणाले.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सुरेश ओबेरॉय म्हणाले…

सलमान खान व विवेक ओबेरॉय दोघांशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनबरोबर संसार थाटला. सुरेश ओबेरॉय यांनी अभिषेकच्या वडिलांबरोबर काम केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सुरेश ओबेरॉय म्हणाले, “मी कधीच अमिताभ बच्चन यांचा मित्र नव्हतो. मी त्यांचा को-स्टार होतो. आमचं नातं कामापुरतं होतं. माझी मैत्री डॅनी मुकुलशी होती. होय, मिस्टर बच्चन यांनी मला त्यांच्या वाढदिवसासाठी आमंत्रित केलं होतं, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आणि ते बऱ्याच गोष्टी लोकांना कळू देत नाहीत. मात्र जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप छान वागतो.”

‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात काम करताना सलमान खान व ऐश्वर्या राय प्रेमात पडले. नंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक आला. ऐश्वर्याचं सलमानशी ब्रेकअप झालं, ती विवेकला डेट करू लागली. यानंतर सलमान खानचा राग अनावर झाला. त्याने विवेकला धमकीही दिली होती. पण २००३ मध्ये विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय वेगळे झाले. त्यानंतर २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. तर, विवेकने प्रियांका अल्वाबरोबर संसार थाटला.