Akshaye Khanna Marriage Plans: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना व अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत दिसले होते.
अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली होती. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह अनेक दिग्गज कलाकारांकडून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.
अक्षय खन्ना अजूनही अविवाहित का आहे?
आता अभिनेता अक्षय खन्ना हा त्याच्या चित्रपटातील भूमिकेमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने छावा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला आयुष्यात लग्न करायचे नाही. त्याच्या त्याच्या आयुष्यावर पूर्णत: नियंत्रण पाहिजे, असे वक्तव्य केले होते. मात्र, अक्षय खन्नाने एका जुन्या मुलाखतीत तो लग्नाबद्दल काय विचार करतो आणि त्याला त्याची जोडीदार कशी पाहिजे यावर वक्तव्य केले होते.
अनुराधा प्रसाद यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अक्षय खन्नाने त्याच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. अक्षय खन्ना म्हणाला होता की मी लग्न करण्याचे टाळत नाही. पण, मला योग्य जोडीदार मिळत नाही. अभिनेता म्हणाला होता, “जोडीदार मिळायला तर पाहिजे. लग्न करण्याचा निर्णय घेण्याआधी तुम्हाला तुमच्यासाठी योग्य मुलगी मिळायला हवी. फक्त कुटुंब लग्नासाठी दबाव टाकत आहे, म्हणून लग्न करण्याची गरज नाही. ते चुकीचे आहे.”
अक्षय खन्ना असेही म्हणाला होता, “माझ्या जोडीदार असणाऱ्या मुलीमध्ये अमुक एखादी विशिष्ट गोष्ट असायलाच हवी, असे मला वाटत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या गुण अवगुणांसह प्रेमात पडता. त्याला एक कारण असू शकत नाही. एखाद्या मुलीबरोबर माझं राहिलेलं सगळं आयुष्य घालवावं, अशी भावना आजपर्यंत कोणाबद्दल माझ्या मनात जागृत झाली नाही. आजपर्यंत असं कधीही घडलं नाही. मी आशा करत आहे की हे कधीतरी घडेल.”
“मी लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे, असे मला वाटत नाही. मी तडजोडी करू शकतो का, हे सुद्धा मला माहित नाही. पण, मला वाटतं की माणूस जेव्हा प्रेमात पडतो, तेव्हा तो या सगळ्या गोष्टी करतो. मी कधीच अरेंज मॅरेज कऱणार नाही. प्रेमविवाह व्हायला पाहिजे. लग्नात लोक सहसा ज्या तडजोडी करतात त्या मी फक्त तेव्हाच करू शकेन जेव्हा मी त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडा असेन. नाहीतर, ते शक्य होणार नाही.”
अक्षय खन्नाने काही दिवसांपूर्वीच ‘हिंदूस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अक्षय खन्ना त्याच्या लग्नाबाबत म्हणाला, “मी लग्न करेन, असे मला वाटत नाही. लग्नात तुम्हाला वचनबद्ध राहावे लागते. तुमच्या आयुष्यात मोठा बदल होतो. खूप गोष्टी बदलतात. मला माझ्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवे आहे. जेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य दुसऱ्या कोणासोबत शेअर करता तेव्हा तुमचे पूर्ण नियंत्रण असू शकत नाही. तुम्ही एकमेकांबरोबर आयुष्य शेअर करता”, असे म्हणत अभिनेत्याने तो अद्याप अविवाहित का आहे, यावर वक्तव्य केले होते.