गुटखा आणि पान मसलाच्या जाहिरातींमुळे सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागलेले बॉलिवूड कलाकार आता या प्रकरणात आणखीच फसताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग या बॉलिवूड अभिनेत्यांच्या विरोधात पान मसाला आणि गुटखा ब्रँड प्रमोट केल्याच्या मुद्द्यावरून बिहारच्या एका न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला मुजफ्फरपूरमधील एक समाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी दाखल केला आहे.

काही काळापूर्वीच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पान मसाल्याची जाहिरात करताना दिसला होता. फिटनेस आणि आरोग्याच्या बाबतीत अतिशय जागरुक असणाऱ्या अक्षयनं अशाप्रकारची जाहिरात करणं लोकांना अजिबात रुचलं नाही आणि त्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. वाढता वाद पाहून अक्षयनं चाहत्यांची माफी मागत पुन्हा अशाप्रकारच्या जाहिरातीचा भाग होणार नसल्याचं म्हटलं होतं. तसेच या जाहिरातीसाठी मिळालेलं मानधन दान करणार असल्याचं देखील त्यानं यावेळी सांगितलं होतं.

आणखी वाचा- थाट कान्स फेस्टिव्हलचा पण चर्चा दीपिकाच्या कानातल्यांची; युजर म्हणाले, “कशासाठी एवढा अत्याचार…”

एकीकडे अक्षय कुमारनं या जाहिरातीतून काढता पाय घेतला असला तरीही अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगण यांची पान मसाल्याची जाहिरात मात्र सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहिली आहे. दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मागच्याच वर्षी ते जाहिरात करत असलेल्या तंबाखूच्या ब्रँडसोबतचं क्रॉन्ट्रॅक्ट संपल्याचं एका अधिकृत स्टेटमेंटमधून स्पष्ट केलं होतं. पण तरीही त्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. याशिवाय अभिनेता रणवीर सिंगही पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी अभिनेता रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात कलम ‘४६७’, ‘४६८’, ‘४३९’ आणि ‘१२० ब’च्या अंतर्गत खटला दाखल केला आहे.

आणखी वाचा- “म्हातारी दिसतेय…” Cannes 2022 लुकमुळे ऐश्वर्या राय झाली ट्रोल

चार्जशीटमध्ये या चारही कलाकारांवर पैशाच्या लालसेपोटी आपल्या प्रसिद्धीचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या खटल्याची सुनावणी २७ मे रोजी होणार आहे. तमन्ना यांच्या मते, या कलाकारांनी अशाप्रकारचे ब्रँड प्रमोट केल्यानं मुलांवर वाईट परिणाम होईल आणि ते देखील याचं सेवन करू लागतील.