दिया मिर्झा चार वर्षांपूर्वी एका मुलाची आई झाली. तिचा गर्भधारणेचा टप्पा सोपा नव्हता. प्रसूतीच्या वेळी तिला खूप समस्या आल्या. ती एका आठवड्यासाठी तिच्या मुलापासून दूर राहिली आणि स्वतः मृत्यूपासून थोडक्यात बचावली. अलीकडेच दियाने पहिल्यांदाच त्या टप्प्याबद्दल खुलासा केला आहे.
दिया मिर्झाने २०२१ मध्ये वैभव रेखीबरोबर दुसरे लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिने मुलाला जन्म दिला. वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणे दियासाठी वेदनादायक होते. तिच्या पोटात संसर्ग झाला होता, ज्यामुळे तिची अकाली प्रसूती झाली.
गरोदरपणात दिया मिर्झाला झाला जीवघेणा संसर्ग
परिस्थिती अशी होती की दिया मिर्झा स्वतः मृत्यूपासून थोडक्यात बचावली. पीपल ऑफ इंडियाशी बोलताना दिया म्हणाली, “मला बॅक्टेरियाचा संसर्ग झाला होता, जो माझ्या अपेंडिक्स शस्त्रक्रियेचा दुष्परिणाम असू शकतो. माझ्या गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यात माझी शस्त्रक्रिया झाली. माझ्या सहाव्या महिन्याच्या अखेरीस आम्हाला जाणवले की, माझ्या प्लेसेंटामधून रक्तस्त्राव होत आहे आणि माझे शरीर सेप्सिसकडे जात आहे. जर बाळाचा जन्म झाला नसता तर आमच्या दोघांनाही वाचवता आले नसते, ते खूप भयानक होते.”
दीया मिर्झा मुलाखतीत पुढे म्हणाली की, जेव्हा ती रुग्णालयात गेली तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले होते की फक्त तिच्या मुलाला वाचवा. याबद्दल दिया म्हणाली, “त्यांना ४८ तासांनंतर कळले की माझ्या आत असलेले बॅक्टेरिया घातक आहेत. जन्मानंतर ३६ तासांनी अव्यानवर (मुलाचे नाव) जीवनरक्षक शस्त्रक्रिया करावी लागली. माझ्या मुलाच्या आतड्यात छिद्र होते आणि त्याची शस्त्रक्रिया झाली. मुळात आतडे शरीराबाहेर काढण्यात आले होते.”
दिया मिर्झा म्हणाली की, तिच्या मुलाच्या जन्मानंतर तिला आठवड्यातून फक्त दोनदाच त्याला भेटता येत होते. २० दिवसांनी मुलाला डिस्चार्ज देण्यात आला आणि कोणतीही नर्स त्याला स्पर्श करायलाही तयार नव्हती. ती एकटीच तिच्या मुलाचे कपडे घालत होती. बाळाचे वजन साडेतीन किलो झाल्यावर त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली, जी तीन-चार तास चालली. त्यानंतर बाळाचा स्टोमा बरा झाला.