‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे सध्या मराठी अभिनेते उपेंद्र लिमये चांगलेच चर्चेत आले आहेत. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये त्यांनी लहानशी फ्रेडी पाटील या शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका साकारली आहे. उपेंद्र लिमयेंच्या एन्ट्रीचे बरेच सीन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटातील भूमिकेला मिळणाऱ्या या भरघोस प्रतिसादानंतर उपेंद्र यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. याशिवाय बॉलीवूडमध्ये यापूर्वी काम करताना आलेले अनेक अनुभव त्यांनी नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखातीत सांगितले.

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार राज’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मुख्य कलाकारांशिवाय या चित्रपटात उपेंद्र लिमयेंनी कांतीलाल वोरा या खलनायकाची भूमिका साकारली होती. याविषयी सांगताना ते म्हणतात, “‘सरकार राज’ चित्रपटाचा हा किस्सा मी यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सांगितला आहे. त्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी अगोदर एका वेगळ्या अभिनेत्याला कास्ट करण्यात आलं होतं. परंतु, सेटवर बच्चन साहेब समोर आल्यावर त्या अभिनेत्याला काम करता येत नव्हतं. तो बंद पडला…त्यामुळे त्या दिवशीचं संपूर्ण शूटिंग कोलमडलं. अमिताभ बच्चन ज्या सिनेमात काम करत आहेत त्या चित्रपटाचं एका दिवसाचं शूटिंग बंद होणं म्हणजे केवढं नुकसान झालं असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.”

हेही वाचा : रितेश देशमुखने कापले लाडक्या लेकाचे केस, पत्नी जिनिलीया फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा मुलगा…”

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “रामूने या घटनेनंतर अमिताभ यांना वचन दिलं की, मी लवकरात लवकर दुसऱ्या अभिनेत्याला या भूमिकेसाठी उभं करेन. अमिताभ सर आणि रामूचं बोलणं झाल्यावर त्याने मला लगेच फोन केला. सगळी परिस्थिती मला व्यवस्थित सांगितली आणि तुझ्या वयाची ही भूमिका नव्हती त्यामुळे तुला आधी विचारलं नाही असंही तो म्हणाला. आमच्या दोघांचं बोलणं झालं आणि मी सेटवर गेलो. सगळं शूटिंग व्यवस्थित पार पडलं.”

हेही वाचा : अगस्त्य नंदाच्या मामा-मामीने केला ‘द आर्चीज’चा रिव्ह्यू; अभिषेकला आठवले जुने दिवस, तर ऐश्वर्या राय म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पुढे काही दिवसांत रामूने बच्चन साहेब, अभिषेक आणि ऐश्वर्यासाठी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग ठेवलं होतं. त्या स्क्रिनिंगला रामूने मला सुद्धा बोलावलं होतं. तो चित्रपट संपूर्ण पाहून बच्चन साहेबांनी मला मिठी मारली आणि ते म्हणाले होते, तू खरंच खूप अप्रतिम अभिनय केला आहेस. तुला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! त्यांची एक मिठी त्यावेळी मला राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यासमान वाटली होती. प्रेमाने असं जवळ घेऊन एवढ्या मोठ्या अभिनेत्याने तुमचं कौतुक केलं की, मनात एक वेगळीच उर्जा व उत्साह तुमच्यात निर्माण होतो.” असा अनुभव उपेंद्र लिमयेंनी सांगितला.