Ashok Saraf & Sayali Sanjeev : पद्मश्री अशोक सराफ ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानतात. सायलीची ‘काहे दिया परदेस’ ही मालिका ते आवर्जून पाहायचे. एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला अशोक सराफ व सायली संजीव यांची पहिली भेट झाली होती. अभिनेत्री त्यांना ‘पप्पा’ म्हणते.
सायली संजीवने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने अशोक सराफ यांनी दोन वर्षांपूर्वी करिअरच्या दृष्टीकोनातून मोलाचा सल्ला दिल्याचं सांगितलं.
सायली संजीव अशोक सराफ यांच्याबद्दल सांगते, “आम्ही दोघंही खूप फोनवर बोलतो. मी आणि पप्पा जवळपास अर्धा-पाऊणतास फोनवर गप्पा मारत असतो. त्यांना महाराष्ट्रभूषण, पद्मश्री असे अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत आणि त्यांची मी मानलेली मुलगी आहे ही भावनाच खूप कमाल आहे, मला भारी वाटतं.”
सायली पुढे सांगते, “पप्पा माझ्याशी अनेक विषयांवर चर्चा करतात. आपण काम कसं केलं पाहिजे, काम करताना स्क्रिप्टबाबत अजिबात तडजोड करायची नाही. असं आमचं बरंच बोलणं होतं. ते बरीच वर्षे सोशल मीडियावर नव्हते. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट टीमकडून सुरू करण्यात आलं आहे. आधी ते सोशल मीडियावर एवढे सक्रिय नसायचे. पण, माझ्या सगळ्या पोस्ट वगैरे ते पाहायचे. मलाही प्रश्न पडायचा…ते माझ्या पोस्ट कुठे पाहत असतील पण, त्यांचं माझ्यावर खूप लक्ष असतं. एका बाबाचं आपल्या मुलीकडे जसं लक्ष असलं पाहिजे तेवढं लक्ष त्यांचं माझ्यावर असतं. ही किती छान गोष्ट आहे.”
“साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांनी माझे सोशल मीडियावर काही फोटो पाहिले आणि मला असाच एकदा फोन केलेला तेव्हा सांगितलं, हे सगळे फोटो तू फारच छान काढतेस. मला प्रचंड आवडले पण, ‘सतत लोकांना दिसत राहिलं की आपली किंमत कमी होते.’ मला तेव्हा काहीच समजलं नव्हतं. कारण, एकदम खरं सांगायचं झालं, तर अलीकडच्या काळात सोशल मीडियाकडे मानधन उपलब्ध करून देण्याचं माध्यम म्हणूनही पाहिलं जातं, इन्स्टाग्राम-फेसबुकवरच्या जाहिराती असो किंवा आणखी काही गोष्टी…या माध्यमातूनही पैसे कमावता येतात. त्यामुळे त्या कामाला मी कधीच कमी लेखणार नाही, सोशल मीडियावरूनही अनेकांना कामं मिळतात, ही सकारात्मक बाजूही आहे…हाच सगळा विचार करून मी दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. पण, त्यांचं ( अशोक सराफ ) म्हणणं वेगळं होतं.” असं सायलीने सांगितलं.
अशोक सराफ यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला
सोशल मीडियाबाबत अशोक सराफ व सायली संजीव यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “आमची यावर चर्चा झाली…पप्पा म्हणाले, आपण लोकांना सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी इतक्या सहज अव्हेलेबल करून देतो की, ते तुला थिएटरमध्ये बघायला का येतील? मला ती गोष्ट प्रचंड हिट झाली… त्यानंतर मला त्याचं गांभीर्य जाणवलं. जर, मी लोकांना सतत दिसतेय तर लोक मला स्क्रिनवर बघायला का येतील? हा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. आता मी सोशल मीडियावर सक्रिय असते पण, पोस्ट वगैरे शेअर करत नाही. कारण, चाहत्यांनी तुम्हाला मिस केलं पाहिजे असं पप्पांचं म्हणणं होतं. कारण, त्यांच्यावेळी असं काहीच नव्हतं.”
“मी खरंच भाग्यवान आहे म्हणून अशोक पप्पांसारखी मोठी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. ही सगळी मोठी माणसं वेळोवेळी मला खूप चांगला सल्ला देतात. मलाही पप्पांचं म्हणणं पटलं…यापूर्वी मी सकाळ, दुपार, संध्याकाळ सोशल मीडियावर सक्रिय असायचे पण, आता तसं करत नाही. मी माझ्यात खूप बदल केला. खरंच त्यांचा सल्ला ऐकून मला असं पटकन डोळे उघडल्यासारखं झालं. या सगळ्याचं श्रेय अशोक सराफ सरांचं आहे.” असं सायली संजीवने सांगितलं.