१९८१ मध्ये प्रदर्शित झालेला आणि बॉलीवूडमधील सर्वांत प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘उमराव जान’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये परतणार आहे. २७ जूनपासून प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये पाहता येईल.
राष्ट्रीय चित्रपट संग्रह (NFAI) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांनी या क्लासिक चित्रपटाचे पुनरुज्जीवन केले आहे; जेणेकरून नवीन पिढीलाही १९ व्या शतकातील या अद्भुत निर्मितीशी परिचित होण्याची संधी मिळेल.
असे म्हटले जाते की, हे कॉफी टेबल बुकमध्ये ‘उमराव जान’ चित्रपटाच्या निर्मितीचे पडद्यामागील दुर्मीळ फुटेज सादर केले गेले आहेत. त्याशिवाय या पुस्तकात चित्रपटाच्या सेटवरील कधीही न पाहिलेले फोटोज, कॉस्ट्यूम स्केच, सुलेखन, कविता आणि वैयक्तिक आठवणीदेखील आहेत. चित्रपटात रेखा यांच्यावर चित्रित केलेल्या खय्यामच्या संगीतातील ‘शहरयार’च्या रचनांपैकी ‘दिल चीज क्या है’, ‘इन आँखों की मस्ती’ व ‘जुस्तुजू जिसकी थी’ हे अजूनही हिंदी चित्रपट संगीताचा वारसा आहेत.
मुझफ्फर अली दिग्दर्शित या चित्रपटात रेखा यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटाची कथा, संगीत व दिग्दर्शनासाठी खूप कौतुकास्पद कामगिरी झाली. चित्रपटाच्या री-रिलीजची घोषणा पीव्हीआर आयनॉक्सने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये पीव्हीआरने लिहिले आहे- ‘भव्यता, प्रेम व अमर संगीताची कहाणी. ‘उमराव जान’ पुन्हा एकदा पाहा, एका आश्चर्यकारक 4K अनुभवासह.’
चित्रपटाचे दिग्दर्शक मुझफ्फर अली म्हणाले, “उमराव जान हा फक्त एक चित्रपट नव्हता; तर तो एका हरवलेल्या संस्कृतीच्या आत्म्यात डोकावण्याचा प्रवास होता. मला आनंद आहे की, आता नवीन पिढीलाही हा काळ आणि संस्कृती मोठ्या पडद्यावर पाहता येईल.” स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, रेखाव्यतिरिक्त फारूख शेख, नसीरुद्दीन शाह, राज बब्बर, शौकत कैफी आणि गजानन जहागीरदार यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात काम केले होते. हा फारुख जाफर यांचा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी उमरावच्या आईची भूमिका केली होती.
न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, रेखा यांनी ‘उमराव जान’च्या री-रिलीजपूर्वी या चित्रपटाशी त्यांचे नाते किती खोल आहे हे व्यक्त केले. रेखा म्हणाल्या, “उमराव जान हा फक्त मी अभिनय केलेला चित्रपट नाही – तर तो माझ्या खूप जवळ आहे. जेव्हा हा चित्रपट बनवला गेला तेव्हा आपल्यापैकी कोणीही कल्पनाही केली नव्हती की हा चित्रपट काळ आणि अवकाशाच्या पलीकडे जाईल. कोणाला माहीत होतं की, हा चित्रपट हळूहळू भारतीय चित्रपटसृष्टीत नाव करील. मोठ्या पडद्यावर परत येताना पाहणं म्हणजे नवीन पिढीनं जुनं प्रेमपत्र उघडल्यासारखं आहे. माझं हृदय भरून आलं आहे.”