आपल्या कॉमेडीने सर्वांना हसायला लावणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. तब्बल ४२ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचं अखेर २१ डिसेंबर २०२२ रोजी निधन झालं. त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुटुंबिय अद्याप या दुःखातून सावरलेले नाहीत. त्यांची मुलं अंतरा आणि आयुष्मान सोशल मीडियाच्या माध्यामातून व्यक्त होताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या ट्विटरवरून त्यांची मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, “राजू श्रीवास्तव यांनी आपल्या आयुष्यात हास्य आणि साकारात्मकता दिली होती. ते आपल्याला खूपच लवकर सोडून गेले. पण एवढी वर्षं केलेल्या त्यांच्या कामामुळे ते लाखो लोकांच्या हृदयात कायम जीवंत राहणार आहेत. त्याचं निधन खूपच दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसह आहेत. ओम शांती.”

आणखी वाचा- Video : …अन् शोकसभेदरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “आयुष्यच संपलं…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्वीट शेअर करताना राजू श्रीवास्तव यांच्या मुलांनी लिहिलं, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यावेळी बाबा जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. त्यावेळी तुम्हाला त्यांची सतत काळजी वाटत होती. तुमचा हा संदेश या दुःखात आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांनी पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा देत आहे. तुम्ही दाखवलेल्या या मोठेपणासाठी मनापासून धन्यवाद.’

याशिवाय आणखी एका पोस्टमध्ये अंतरा आणि आयुष्मानने गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानले आहेत. २१ सप्टेंबर रोजी राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत अमित शाह यांनी ट्वीट केलं होतं. त्यावर अंतरा आणि आयुष्मानने लिहिलं, ‘माननीय गृहमंत्रीजी तुमची संवेदनशीलता प्रणम्य आहे. बाबा रुग्णालयात असताना तुम्ही आणि तुम्ही खास नियुक्त केलेले अधिकारी सातत्याने आमच्या संपर्कात होते. तुम्ही घेतलेली ही काळजी आमच्यासाठी मोलाची बाब आहे. आमचं संपूर्ण कुटुंब यासाठी कृतज्ञ आहे.’