यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजय मिळवला. तब्बल १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचा चषक उंचावला. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र या आनंदाला गालबोट लागणारी एक घटना घडली. विजयानिमित्त बंगळुरूत आरसीबीच्या संघाची विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

चिन्नास्वामी या आरसीबीचं होमग्राऊंड असलेल्या स्टेडियमवर संघाचा विजयी जल्लोष अनुभवण्यासाठी चाहत्यांनी तुफन गर्दी केली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी होऊन ११ जण दगावले, तर ४७ जण जखमी झाले. याबद्दल आता सर्वच स्तरातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच प्रसिद्ध गायिका नेहा सिंह राठोडने या चेंगराचेंगरी घटनेबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नेहा सिंह राठोड सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल तिची मतं व्यक्त करताना दिसते. याआधीही तिने अनेकदा आपली राजकीय मतं व्यक्त केली आहेत. अशातच बंगळुरूमधील चेंगराचेंगरीबद्दल तिने एक्सवर पोस्ट शेअर करत घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. सरकारला धारेवरही धरत तिने या दुर्दैवी घटनेला सरकारचं अपयशदेखील म्हटलं आहे.

नेहा सिंह राठोडने एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात यात लिहिले आहे की, “जगातील सर्व धर्म मृत्यूचे प्रमुख कारण राहिले आहेत आणि आता या नवीन क्रिकेट धर्मानेही आपलं काम सुरू केलं आहे. सरकारचे अपयश, देशातील बेरोजगारी आणि लोकांना गुंतवून ठेवण्याचे हे षड्यंत्र आता आपले रंग दाखवू लागले आहेत. जय शाह यांना काय असंच आणलं गेलेलं नाही.”

दरम्यान, विराट कोहली जेव्हा ‘आरसीबी’च्या विजयी ट्रॉफीसह चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पोहोचला; तेव्हा तिथे उत्सवाचं वातावरण होतं. लाखो लोक याठिकाणी जमले होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला. क्षणार्धात या विजयी उत्सवाचं वातावरण शोकात्मक परिस्थितीत झालं. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर नरेंद्र मोदींनी “बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय, त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना देवाकडे करतो,” असे ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी १० लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.