झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमातील विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडलं. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. मात्र सध्या या कार्यक्रमातील एक प्रसिद्ध विनोदवीराने ‘चला हवा येऊ द्या’मधून काढता पाय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे सागर कारंडे. या कार्यक्रमात सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं. मात्र आता सागर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पुन्हा दिसणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये कार्यक्रमातील पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतली आहे. या व्हिडीओमध्ये पत्राच्या रुपात श्रेया कविता वाचताना दिसत आहे. श्रेया पत्र वाचत आहे हे पाहून नेटकऱ्यांनीही विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

सागर कारंडे यांना फार छान जमतं, सागर सारखा आवाजामध्ये गंभीरपणा नाही, सागरचे पत्र वाचन म्हणजे काळजाला भिडतं बाकी चांगला प्रयत्न श्रेया, सागर कारंडे कुठे आहेत?, त्यांनी शो सोडला का? अशा विविध कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पण सागरने हा कार्यक्रम सोडला असल्याची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.