Bigg Boss Marathi 5 चे पर्व पहिल्या दिवसापासून मोठ्या चर्चेत होते. या घरात १६ सदस्यांनी प्रवेश केला होता. पहिल्या आठवड्यातच त्यांच्यामध्ये दोन गट पडले. निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकरांना उलट बोलत भांडणाला सुरुवात केली. तशी घराबाहेरील प्रेक्षक आणि कलाकारांनीही सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात केली. बिग बॉसच्या सदस्यांच्या खेळावर व्यक्त होणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता पुष्कर जोग हा आहे.

काय म्हणाला पुष्कर?

आता अभिनेता पुष्कर जोगने ‘एंडमोल शाइन इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी त्याने बिग बॉसच्या शोविषयी वक्तव्य केले आहे. बिग बॉसबाबत त्याचे अनुभव सांगताना पुष्कर म्हणतो, “बिग बॉसमुळे माझे आयुष्य बदलले. हा शो केल्यानंतर माझ्या करिअरमध्ये प्रगती झाली, तसेच मला व्यक्ती म्हणून स्वत:मध्ये चांगले बदल करता आले. मला यश मिळू लागले. याचे संपूर्ण श्रेय मी बिग बॉसच्या शोला देतो. एक माणूस म्हणून लोकांची, कुटुंबाची किंमत मला कळायला लागली. सोशल मीडियाच्या पलीकडे आयुष्य सुरू होते. ते आयुष्य तुम्हाला बिग बॉसमध्ये जगायला मिळते.”

“लोकांना वाटतं हा शो स्क्रिप्टेड आहे; पण मला हे सांगायचं आहे की, कोणत्याही बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड नसतो. तो एक अवघड शो आहे. मला तर बिग बॉसने सगळं काही दिलंय. मला या शोनं दुसरं आयुष्य दिलंय. मला जी संधी दिली गेली, त्याबद्दल मी कलर्स टीव्ही, एंडमोल, बिग बॉस यांच्याप्रति कायम कृतज्ञ राहीन”, असे म्हणत पुष्करने बिग बॉसमुळे आपल्याला नवीन आयुष्य मिळाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Video: वर्षा उसगांवकर ‘या’ सदस्याला म्हणाल्या सेक्सी, अरबाजने सांगितला घरच्यांना किस्सा, पाहा व्हिडीओ

पुष्कर जोगने बिग बॉसच्या पहिल्या पर्वात टॉप २ पर्यंत मजल मारली होती. त्या पर्वात मेघा धाडे ट्रॉफी आपल्या नावावर करीत विजेती ठरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर पुष्कर सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतो. त्याने अनेकदा निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर यांच्या वागण्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच त्याने वैभव चव्हाण आणि निक्की तांबोळीचे भांडण झाल्याचा एक व्हिडीओ कलर्स मराठीने शेअर केला होता, त्यावर कंमेट करत निक्कीबाबत आधी केलेली पोस्ट खरी होती, असे म्हटले आहे. आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.