आयपीएल २०२५ स्पर्धेच्या यंदाच्या महाअंतिम सोहळ्यात पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे दोन संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या दोन्ही संघांनी आजवर कधीही आयपीएलचा चषक जिंकलेला नाही. त्यामुळे या दोन्ही संघाचे चाहते आयपीएल २०२५ स्पर्धेच्या महाअंतिम सामान्यासाठी खूपच उत्सुक आहेत. या दोन्ही संघाचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्यानेही रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पाठींबा दिला आहे.

‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘इश्कबाज’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं २’ आणि ‘३’ सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता म्हणजे नुकल मेहता. अभिनेता असण्याबरोबरच तो बँगलोर या संघाचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएलचा महाअंतिम सोहळा त्याच्या आवडीच्या संघाने जिंकावा म्हणून त्याने खास व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच अभिनेत्याने बँगलोर जिंकल्यास विराटचं मंदिर बांधणार असल्याचंही सांगितलं आहे.

नकुल मेहताने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं, “अखेर १८ वर्षांनंतर तो दिवस आला आहे, जिथे आपण (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) ट्रॉफी उचलू. विराट हा इतिहासातील सर्वोत्तम आयपीएल खेळाडू आहे आणि तो त्याची पहिली आयपीएल ट्रॉफी उचलणार आहे. आरसीबी, तुम्ही कधीही हार न मानण्याचे सौंदर्य आहात आणि तुम्ही आम्हाला संयमाचा खरा अर्थ शिकवला आहे. आरसीबी, तुम्ही फक्त जिंका आणि जर तुम्ही जिंकलात तर मी कन्नड भाषा शिकेन.”

यापुढे तो व्हिडीओमध्ये असं म्हणतो, “मी दक्षिण भारतीय नाश्तादेखील खायला सुरुवात करेन. मी विराट कोहलीसाठी मंदिर बांधेन, नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात फक्त आणि फक्त रसम खाईन. मी विजय मल्ल्यांचे सर्व कर्जदेखील फेडेन. माफ करा हे थोडं जास्तच होत आहे. पण ते जाऊद्या, तुम्ही आता माझ्या भावना बघा आणि फक्त यंदाची आयपीएलची ट्रॉफी जिंका.” नकुलच्या या व्हिडीओवर चाहत्यांश अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबने २०१४ मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच आयपीएलची ट्रॉफी न जिंकणारे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचे चाहते आणि इतर क्रिकेटप्रेमींनादेखील आजच्या अंतिम स्पर्धच्या सामन्याची उत्सुकता आहे.