ऑगस्ट महिना हा मोठे चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. स्वातंत्र्य दिन आणि त्याला जोडून येणाऱ्या सुट्ट्या, राखीपौर्णिमा, दहीहंडी यांसारख्या सणांचा उत्साह यामुळे या महिन्यात हिंदी आणि मराठीतील अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र यंदा महाराष्ट्रात पावसामुळे अनेक ठिकाणची पूरसदृश परिस्थिती आणि १५ ऑगस्टला तीन हिंदी चित्रपटांचे एकाच वेळी प्रदर्शित होणे यामुळे चांगले मराठी चित्रपट पुढे गेले.
आता सप्टेंबरमध्येही गणेशोत्सव येत असल्याने त्यावेळी केवळ तीनच मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे वर्षा अखेरच्या तीन महिन्यांत हिंदी आणि मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी एकच गर्दी होणार आहे. जुलै महिन्यात ‘बाई गं’ आणि ‘घरत गणपती’ हे दोन चित्रपट सोडून अन्य कोणतेही मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते. त्यामुळे ९ ऑगस्टला प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने एक उत्साह निर्माण झाला असता, त्यानंतर १५ ऑगस्टला हिंदीत तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार होते. पण, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने आणि पूरपरिस्थिती असल्याने ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे प्रदर्शन ऑगस्टमध्ये न करता पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ‘लाईफ लाईन’ आणि ‘बाबू’ हे दोन मराठी चित्रपट, तर हिंदीत अजय देवगण – तब्बू जोडीचा ‘औरो में कहां दम था’ आणि जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘उलझ’ असे चारच चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातही जुलैच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘घरत गणपती’ आणि ‘डेडपूल अॅण्ड वुल्वरिन’ या हॉलीवूडपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘डेडपूल अॅण्ड वुल्वरिन’ या हॉलीवूडपटाची फक्त भारतातील कमाई ७५ कोटी रुपयांच्या पलीकडे गेली. त्या तुलनेत ऑगस्टमध्ये मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झालेल्या तीन हिंदी चित्रपटांची कामगिरीही खूप चमकदार म्हणता येणार नाही.
एरव्हीही हिंदीत एकाच वेळी मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असतील, तर त्यापुढच्या एक-दोन आठवड्यात इतर कोणतेही हिंदी वा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा धोका पत्करला जात नाही. यावेळी १५ ऑगस्टला बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘स्त्री २’ हा सिक्लेवपट, अक्षय कुमार – तापसी पन्नू – वाणी कपूर – फरदीन खान अशी मोठी कलाकार मंडळी असलेला ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहम – शर्वरी वाघ जोडीचा ‘वेदा’ हा अॅक्शनपट असे तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या तीन चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे पुढच्या दोन आठवड्यांत एकही हिंदी मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मराठीतही समर्थ रामदास स्वामी यांच्या आयुष्यावर आधारित, अभिनेता विक्रम गायकवाड याची मुख्य भूमिका असलेला ‘रघुवीर’ हा उल्लेखनीय चित्रपट आणि सौरभ गोखले – प्राजक्ता गायकवाड यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फौजी’ हे दोन चित्रपट सोडले तर ‘थर’, ‘युवा नेता’, ‘नेता गीता’ असे नवोदित कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
अन्य कोणताही मोठा हिंदी चित्रपट स्पर्धेत नाही, प्रदर्शित झालेल्या तीन हिंदी चित्रपटांपैकी ‘स्त्री २’ वगळता अन्य चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नसताना मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी चांगला वाव होता. मात्र तसे झालेले नाही.
सप्टेंबर महिन्यातही गणेशोत्सवाची धामधूम असल्याने पहिल्या दोन आठवड्यात एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही आहे. हिंदीत कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेला ‘इमर्जन्सी’ आणि करीना कपूर – हंसल मेहता ही वेगळी कलाकार – दिग्दर्शक जोडी एकत्र आणणारा ‘द बकिंगहॅम मर्डर’ हे दोनच हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे पहिला आठवडा मनोरंजनाच्या दृष्टीने फारसा धमाकेदार ठरणारा नाही. २० सप्टेंबरला प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा बहुचर्चित ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर २७ सप्टेंबरला ‘धर्मवीर २’ प्रदर्शित होणार आहे. अतिवृष्टी आणि नंतर आलेले सणवार लक्षात घेता अनेक हिंदी – मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांचे प्रदर्शन ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पुढे ढकलले आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस एकाच वेळी तीन-चार मराठी, तीन-चार हिंदी चित्रपट एवढ्या संख्येने चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.