अंगावर ओढवलेली परिस्थिती माणूस जेव्हा स्वत: कथन करतो किंवा मांडतो, तेव्हा त्यातील वास्तव अधिक गडदपणे आणि गांभीर्याने समोर येते. शेतकऱ्यांच्या व्यथा भोगून चुकलेल्या व्यक्तीने अशा व्यथाग्रस्त शेतकऱ्यांचे वास्तव पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा खऱ्या अर्थाने ‘भाकर’ साकारली. शेतकरी आत्महत्यांच्याही पुढे जाणारा हा चित्रपट कसा साकारला गेला हे या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक विजय सहदेव पोहनकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर..’ या टॅगलाईनवर बेतलेला ‘भाकर’ चित्रपट येत्या २३ मे रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील १२ देशात ही ‘भाकर’ पोहोचणार आहे. एवढेच नव्हे तर सर्व फिल्म फेस्टिवलमध्ये या ‘भाकरी’ने प्रवेश निश्चित केला आहे. महाराष्ट्रातील ८७ चित्रपटगृहांमध्ये एकाच दिवशी त्याचा प्रवेश होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर पोहनकर यांच्यासह या चित्रपटातील कलावंत नितीन भजन व सहनिर्माते चंद्रशेखर पिंपळे नागपुरात आले होते.
वास्तव अनेकजण मांडण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला कुठेतरी चित्रपटाचा चेहरा असतो. या चित्रपटाला चित्रपटाचा चेहरा न देता तो वास्तवपणे कसा मांडता येईल, याचाच प्रयत्न करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा गावात त्याचे चित्रीकरण कोणताही सेट न उभारता करण्यात आले. कलावंतांच्या चेहऱ्यावर पावडरचा थर नाही, केसांवर शाम्पूची चमक नसल्यामुळे हा वास्तवदर्शी चित्रपट वास्तव साकारता आल्याचे पोहनकर यांनी सांगितले.
एक तास ५५ मिनिटांचा हा संपूर्ण चित्रपट म्हणजे ‘फ्लॅशबॅक’ आहे. अवघी उणीपुरी तीन गाणी आणि ती सुद्धा कलावंतांच्या तोंडी न घालता परिस्थितीनुसार टाकण्यात आली आहेत. निसर्गाची अवकृपा होते तेव्हा शेतकरी आत्महत्या करतो आणि व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी वळते तेव्हा तो एकतर अहिंसा किंवा हिंसेच्या मार्गाला लागतो. या चित्रपटात ही दोन्ही परिस्थिती दाखवण्यात आली आहे. या चित्रपटासाठी पोहनकर यांनी सहा एकर शेती विकली. तब्बल दोन वर्ष स्क्रीप्ट घेऊन फिरावे लागले. सहा महिने चित्रीकरण स्थळ शोधावे लागले आणि त्यानंतर हा चित्रपट तयार झाल्याचे पोहनकर यांनी सांगितले. मूळ नागपूरचाच असलेला नितीन भजन याने या चित्रपटात भूमिका साकारली आहे. पहिल्यांदा वैदर्भीय भाषेत कोणताही दिखावा न करता साकारलेला हा चित्रपट करतानाचा अनुभव काही वेगळाच असल्याचे त्याने सांगितले. विदर्भातीलच असल्यामुळे ती पाश्र्वभूमी होती आणि त्याचा उपयोग भूमिका साकारताना झाल्याचे नितीनने सांगितले.