कांद्याचे दर घसरल्याने निर्यातीस परवानगी देण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने दर घसरत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.

मुंबईसह ठाणे जिल्हा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्य़ांमध्ये कांद्याचे किरकोळ बाजारातील दर ४०-६० रुपये प्रति किलोपासून असून नवीन कांदा या दराने उपलब्ध होत आहे. घाऊक बाजारात दररोज सुमारे

दोन लाख क्विंटल कांदा उपलब्ध होत असून नोव्हेंबरच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीने वाढले असल्याचे पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

घाऊक बाजारात दर कमी असून व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे किरकोळ बाजारात अजूनही काही ठिकाणी कांद्याचे दर चढेच आहेत. केंद्र सरकारने आणखी कांदा आयात केला असून तो १५ जानेवारीच्या सुमारास बाजारात येईल.

हे लक्षात घेऊन कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती आहे. त्यामुळे आता निर्यातीवरील बंदी उठवून आयात रोखण्यात यावी, अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.