लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लोकल प्रवासांवर मर्यादा असतानाही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ होत असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने तब्बल २६ हजार प्रवाशांकडून सात महिन्यांच्या काळात एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तिकीट तपासणी, रेल्वे सुरक्षा दलाला घेऊन नियमित तपासणीबरोबरच विशेष तपासणी मोहीमही हाती घेण्यात आल्या. या वेळी एकूण २५ हजार ९८२ प्रवासी विनातिकीट आढळले. यात १९ हजार १७२ प्रवासी उपनगरीय मार्गावर आढळले असून त्यांच्याकडून ५५ लाख रुपये दंड वसूल केला गेला आहे, तर ६ हजार ८१० प्रवासी मेल-एक्स्प्रेस मार्गावर सापडले आहेत. यामध्येही ऊर्वरित दंड वसूल केला आहे. याशिवाय बनावट ओळखपत्र बाळगून लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. मे ते नोव्हेंबर या काळात हा दंड वसूल करण्यात आला.