आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी वेबसंवाद

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि सद्य:स्थिती यांचा आढावा करोनाविरोधातील लढय़ाचे नेतृत्व करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे घेणार आहेत. ‘लोकसत्ता विश्लेषण’च्या उपक्रमात मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता टोपे यांच्याशी संवाद साधता येईल.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात करोनाचा शिरकाव झाला. चाचण्या, उपचार, विलगीकरण अशी कोणतीच आयुधे हाताशी नसतानाही त्या वेळी करोना प्रतिबंध करून आपण ही लढाई जिंकणार, असा दिलासा भयभीत झालेल्या नागरिकांना आरोग्यमंत्र्यांनी दिला.

अधिकाधिक चाचण्यांसाठी जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांमध्ये प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यावर त्यांनी भर दिला. याशिवाय निदान झालेल्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी मोठय़ा स्तरावर विलगीकरण केंद्रांची निर्मिती करणे आणि राज्यभरातील डॉक्टरांना अत्याधुनिक उपचारांबाबत मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी विशेष कृती दलासह तज्ज्ञांची फळीही त्यांनी उभारली.

खासगी रुग्णालयांकडून होणारी शुल्क लूटमार रोखण्यासाठी रुग्णालयांतील खाटा ताब्यात घेणे, उपचारांचे दर निश्चित करणे, रुग्णवाहिका उपलब्ध करणे, इत्यादी निर्णय टोपे यांनी घेतले. त्यामुळे धारावीसारख्या मोठय़ा झोपडपट्टीमध्ये करोनाचा फैलाव तीन महिन्यांत आटोक्यात आणण्यात यश आले.

सुनियोजित आखणी..

’ देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण आणि सर्वाधिक बळी जात होते. त्यामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरूनही संयम ढळू न देता टोपे यांनी सुनियोजित पद्धतीने करोनाविरोधातील लढाईची आखणी केली. त्यांचा हा अनुभव वेबसंवादातून ऐकता येईल.

’  मुंबई, पुणे वगळता राज्याच्या अन्य भागांमध्ये आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम नाही. तसेच मनुष्यबळही कमी आहे. अशा परिस्थितीत करोना आटोक्यात आणणे आव्हानात्मक आहे. पुन्हा करोनाचा उद्रेक होईल, असा इशारा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काय पूर्वतयारी केली, याचा उलगडाही या संवादातून होईल.

सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/LS_Vishleshan_11Aug येथे नोंदणी आवश्यक.