लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रस्तावित वांद्रे-कुर्ला रेल्वे मार्गिकेचे संरेखन रद्द का केले यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले.

मेट्रो मार्गिकेने वांद्रे आणि कुर्ला परिसर जोडला जाणार असल्याचे सांगत ‘एमएमआरडीए’ने २०११मध्ये हे प्रस्तावित हे संरेखन रद्द केले होते. मात्र वांद्रे – कुर्ला परिसर मेट्रो मार्गिकेने जोडलाच नाही. ही फसवणूक असून ‘एमएमआरडीए’च्या अशा कारभारामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप होत आहे. या आशिष शेलार यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिकेच्या अनुषंगाने पुन्हा व्यवहार्यता तपासणी करता येईल का या संबंधीचाही अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे भविष्यात वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास वांद्रे, कुर्ला, दादर, घाटकोपर आदी ठिकाणची गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे.

‘एमएमआरडीए’ने एकप्रकारे मुंबईकरांची फसवणूक केल्याचा आरोप करीत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काही वर्षांपूर्वी याबाबत राज्य सरकारकडे तक्रार केली होती. त्यानुसार सरकारने यासंबंधीचा अहवाल ‘एमएमआरडीए’कडे मागवला होता. हा अहवाल सादर झाला, पण तो सार्वजनिक न करता दडविण्यात आल्याचा आरोप गलगली यांनी केला होता. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल घेत शुक्रवारी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी, ‘एमएमआरडीए’, मुंबई महापालिका, रेल्वे, वाहतूक, पोलीस आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक शेलार यांनी आयोजित करण्यात आली. त्यामध्ये शेलार यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएमआरडीए’कडून दिशाभूल?

वांद्रे आणि कुर्ला परिसर रेल्वेने जोडण्यासाठी १९६५मध्ये वांद्रे – कुर्ला रेल्वे मार्गिका प्रस्तावित होती. ‘एमएमआरडीए’ने २०१०मध्ये त्याचे संरेखन रद्द करण्यासाठी सूचना, हरकती मागविल्या. यावर नागरिकांनी हरकती घेतल्या, मात्र ‘एमएमआरडीए’ने लवकरच वांद्रे आणि कुर्ला परिसर ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेने जोडले जाणार असल्याने सांगत संरेखन रद्द केले. मात्र, ‘मेट्रो २ ब’ची मार्गिका वांद्रे आणि कुर्ला परिसराशी थेट जोडली गेलीच नाही.