मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसित इमारतींच्या कामाला म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गती देण्यात आली आहे. त्यानुसार वरळीतील ५५६ पुनर्वसित घरांची कामे पूर्ण झाली असून येत्या दोन आठवड्यात या घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्यात येणार आहे. तर नायगाव बीडीडी चाळीतील १९३८ घरांची कामे प्रगतीपथावर असून कामे पूर्ण करत सप्टेंबरमध्ये या घरांचा ताबा पात्र बीडीडीवासियांना देण्याचे नियोजन आहे. त्याचवेळी ना.म.जोशी मार्ग येथील ३४२ पुनर्वसित घरांचेही काम वेगात सुरु असून या घरांची कामे पूर्ण करत डिसेंबरअखेरीस या घरांचा ताबा देण्यात येणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळेस म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ही माहिती देण्यात आली.

वरळी,ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या या तिन्ही प्रकल्पस्थळी पुनर्वसित इमारतींची कामे सुरु आहेत. या कामांना आता वेग देण्यात आल्याची माहिती मंडळाकडून गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देण्यात आली. वरळी बीडीडी चाळीतील ९८६९ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानुसार ९८६९ पैकी ३८८८ घरांची कामे सध्या सुरु आहेत. यातील ५५६ घरांचे काम पूर्ण झाले असून या घरांसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण करत येत्या दोन आठवड्यात या घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंडळाने दिली. त्यामुळे अखेर आता लवकरच ५५६ रहिवाशांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार आहे.

वरळीतील ५५६ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असतानाच याच वर्षात वरळीतील आणखी १४१९ रहिवाशांचेही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण १४१९ घरांचे काम अंतिम टप्प्यात असून हा घरांचा ताबा सप्टेंबरपर्यंत देण्याचे नियोजन मुंबई मंडळाचे आहे. तर वरळीतील आणखी १६४२ घरांच्या कामालाही वेग देण्यात आला असून या घरांच्या ताब्यासाठी मात्र रहिवाशांना आॅगस्ट २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरळीपाठोपाठ नायगाव बीडीडी चाळीतील काही रहिवाशांचेही हक्काच्या घराचे स्वप्न यावर्षी पूर्ण होणार आहे. नायगावमध्ये ३३४४ घरांपैकी १९३८ घरांची कामे सध्या सुरु आहेत. या १९३८ घरांपैकी ८६४ घरांचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करत या घरांचा ताबा सप्टेंबर २०२५ मध्ये देण्याचे नियोजन असल्याची माहिती मंडळाने आढावा बैठकीत दिली. त्याचवेळी ना.म.जोशी मार्ग प्रकल्पाअंतर्गत १२४१ घरांचे काम सुरु असून यातील ३४२ घरांच्या कामाने वेग घेतला आहे. या घरांचे काम पूर्ण करत या घरांचा ताबा डिसेंबर २०२५ पर्यंत देण्याचे नियोजन मंडळाचे आहे.