आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार देशभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बालसिंह चहल यांना नुकतंच हटवण्यात आलं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी आता वरिष्ठ आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अभिजीत बांगर हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. तिथून त्यांची बदली आता मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे. तर, मेट्रो वुमेन म्हणून ओळख असलेल्या आश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. आश्विनी भिडे या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी होत्या. त्यांच्या जागी आता अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बांगर यांची मुंबईत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव हे आता ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून कारभार पाहतील. कैलाश शिंदे यांच्यावर नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारीपदी शुभम गुप्ता, तर धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून विशाल नरवडे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. तर, नागपूरच्या NMRDA च्या आयुक्तपदी संजय मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मनोजकुमार सुर्यवंशी यांना NMRDA च्या आयुक्तपदावरून हटवलं आहे.

हे ही वाचा >> मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.