मुंबई : अंधेरी सबवेत थोड्याशा पावसातही पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता मुंबई आयआयटीची मदत घेण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा विचार आहे. तीव्र उतार असलेल्या अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून नक्की कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील याचा सल्ला आयआयटीकडून घेतला जाणार आहे. हिंदमाताप्रमाणे या भागात भूमिगत टाकी बांधता येईल का याचाही विचार केला जाणार आहे. मात्र तोपर्यंत थोडासा पाऊस पडला की सबवे वाहतूकीसाठी बंद करणे हाच एक मार्ग आहे.
मुसळधार पाऊस पडला की पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये अंधेरी सबवेचे नाव पहिल्या क्रमांकावर असते. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडत असताना व भरतीची वेळ असताना मोगरा नाल्यातील पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जिवित तसेच मालमत्तेची हानी होते.
तसेच हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो. त्यामुळे पालिकेने या भूमिगत मार्गाजवळ पर्जन्यजलवाहिन्यांची विविध कामे हाती घेण्याचे ठरवले होते. मात्र आधी गोखले पुलाच्या दुरूस्तीमुळे ही कामे सुरू होऊ शकली नाहीत. त्याचबरोबर पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढवली तरी फारसा दिलासा मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने या कामाची निविदा गेल्यावर्षी काढली नाही. तसेच अंधेरी सबवेसाठी नक्की कोणत्या उपययोजना कराव्या याबाबत पुन्हा नव्याने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामी आता मुंबई आयआयटीची मदत घेतली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
मुंबईत इतर ठिकाणी पाणी साचले की त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मात्र अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले की त्यात मोठा धोका असतो. वेगान उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे चारचाकी गाडीही वाहून जाऊ शकते. त्यामुळे तेथे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका आता नव्याने नियोजन करणार आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंधेरी सबवे परिसर हा सखल भाग असून जवळच मोठा उतार असल्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडतो तेव्हा प्रति सेकंद ५० हजार लीटर पाणी जोराने वाहत येत असते. त्या तुलनेत नाल्याची रुंदी कमी असल्यामुळे पाणी साचते.
पावसाळ्यात तब्बल ३० वेळा सबवे बंद
अंधेरी सबवे २०२४ च्या पावसाळ्यात तब्बल २८ वेळा वाहतूकीसाठी बंद ठेवावा लागला होता. पंधरा मिनिटे ते चार तास वाहतूक बंद ठेवावी लागली होती. तर २०२३ मध्ये हा भूमिगत मार्ग संपूर्ण पावसाळ्यात २१ वेळा बंद ठेवावा लागला होता. यंदा अद्याप पावसाला पुरेशी सुरूवात झालेली नसली तरी आतापर्यंत तीनदा हा सबवे बंद करावा लागला आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, अंधेरीच्या मोगरा नाल्यामध्ये मलनिस्सारण वाहिन्यांमधील प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा नाला पावसाळा नसतानाही वाहत असतो. त्यामुळे ताशी केवळ २० मिमी पाऊस पडला तरी या परिसरात पाणी भरते. त्यामुळे ताशी ७५ मिमी पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीने या भागाचे नियोजन करावे लागणार आहे. त्याकरीता आयआयटीची मदत घेतली जाणार आहे. पाण्याचा प्रवाह, पाण्याचा वेग, उतार, पावसाचे प्रमाण याचा अभ्यास करून कोणती उपाययोजना करायची ते ठरवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.